आरक्षण सोडतीत महिलांचा बोलबाला

file photo
file photo

जलालखेडा (जि.नागपूर) ः न्यायालयात या आरक्षण सोडतीबाबत जनहित याचिका दाखल केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर स्थगिती आली होती. पुन्हा सोडत होईल, यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. बहुतेक उमेदवार पुन्हा या आरक्षणाच्या सोडती होतील व आमचे सर्कलचे आरक्षण बदलेल, या आशेवर गुडघ्याला बाशिंग बांधून होते. पण या आरक्षणाच्या सोडतीनंतर त्यांची सपशेल निराशा झाली आहे. नरखेड तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणामुळे नरखेड तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक प्रस्थपित राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले. 

जिल्हा परिषदेअंतर्गत नरखेड तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत. यात बेलोना, सावरगाव, जलालखेडा व भिष्णूर या सर्कलचा समावेश होतो. यामध्ये बेलोना सर्कलमधील जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. सावरगाव येथील जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे. जलालखेडा येथील जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. भिष्णूर येथील जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे. या 4 जागांपैकी 3 जागा महिलांसाठी राखीव आहे. आरक्षणामध्ये नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या नरखेड तालुक्‍यात महिलांचा बोलबाला आहे. 

नरखेड पंचायत समितीच्या आठ जागा आहेत. यामध्ये बेलोना, खरसोली, सावरगाव, केवळराम पिपळा, जलालखेडा, मेंढला, भिष्णूर, लोहारी सावंगा या सर्कलचा समावेश होतो. यामध्ये बेलोना सर्कलसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे. खरसोली सर्कल अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. सावरगाव सर्कल नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. केवळराम पिपळा सर्कल सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. जलालखेडा सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मेंढला सर्कल सर्वसाधारणसाठी राखीव आहे. भिष्णूर सर्कल सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. लोहारी सावंगा सर्कल सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. अशाप्रकारे नरखेड पंचायत समितीच्या जागेसाठी आरक्षणाची सोडत झाली आहे. पंचायत समितीच्या 8 पैकी 4 जागा महिलांसाठी राखीव आहे. आरक्षणाचा फटका नरखेड तालुक्‍यातील अनेक नेत्यांना बसला आहे व त्यांना आता घरी बसण्याची वेळ आली. यात उकेश चव्हाण, अनुराधा इंगळे, गोपाल खंडाते यांना जबर धक्का बसला आहे. त्यांचे सर्कल आता त्यांना उमेदवारीसाठी पात्र नसल्याने ते आता माजी ठरतील. त्याचप्रमाणे नरेश अरसडे, बालू जोध, वसंत चांडक, सतीश रेवतकर, अतुल पेठे, बंडू उमरकर, डॉ. ढोकणे, दिनकरराव राऊत, सतीश शिंदे यांसारख्या अनेक नेत्यांचे राजकीय पुनर्वसनाचे स्वप्न भंगले आहे. यामुळे अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच आरक्षणामुळे येणाऱ्या निवडणुकीत पाहिजे तशी रंगत दिसणार नाही तसेच सध्या तरी कोण उमेदवार निवडणूक लढणार, हेदेखील निश्‍चित नसल्यामुळे प्रत्येक पक्ष वेळेवर जे राजकारणात नाहीत त्यांनादेखील उमेदवारी देण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com