मतांचे विभाजन टाळण्याचे आव्हान

Yavatmal-Vasim
Yavatmal-Vasim

शिवसेनेतील वर्चस्व संघर्ष आणि काँग्रेसमधील इच्छुकांची गर्दी, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष यांचीही रिंगणात उतरण्याची तयारी, हे सर्व पाहता येथील निवडणुकीला विविध पैलू असतील. त्याच्या बेरीज-वजाबाकीवर कौल अवलंबून असेल.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात अनेक निवडणुकांमध्ये पारंपरिक मतांचे विभाजन हेच प्रमुख राजकीय पक्षांसमोरचे मुख्य आव्हान आहे. या वेळीही वंचित बहुजन विकास आघाडी आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांकडून मतांच्या विभाजनाचा धोका आहे. ते किती मते घेतात, यावरच आघाडी आणि युतीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी याच तिसऱ्यांदा युतीच्या उमेदवार असतील, हे नक्‍की. काँग्रेसकडून अनेक नावे चर्चेत असली तरी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी पडण्याची शक्‍यता आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीने एकटेच वाटचाल करत प्रवीण पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे; तर बहुजन समाज पक्षाचाही उमेदवार रिंगणात असेल. या दोघांमुळे होणारे मतविभाजन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच धोकादायक ठरण्याची शक्‍यता आहे. 

भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते कडवटपणा विसरून किती जोमाने काम करतात, यावर भावनाताईंच्या मतांची टक्‍केवारी अवलंबून असेल. शिवाय, शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष हा मुद्दा आहेच. ‘मातोश्री’वर नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित काम करण्याचे आदेश दिल्याचे कळते. ते युतीसाठी फलदायक ठरेल. तरीही ‘इनकम्बन्सी’चा धोका नाकारता येत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोरचे मोठे आव्हान काँग्रेसमधील नेतृत्व संघर्ष हाच आहे. काँग्रेसमध्ये ठाकरेंसोबतच शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, वसंत घुईखेडकर असे अनेक नेते प्रभावशाली आहे. ते एकदिलाने नाहीत, हीच समस्या आहे. त्यावर उपाय कसा शोधला जातो, यावरच माणिकराव निवडणुकीत कुठवर मजल मारतील, हे अवलंबून असेल. मतदारसंघात बंजारा आणि मराठा-कुणबी समाजाची भूमिका निर्णायक आहे. युती आणि आघाडीचे दोन्ही संभाव्य उमेदवार मराठा (कुणबी) आहेत. त्यामुळे या समाजाच्या मतांचे विभाजन अटळ आहे. बंजारा समाजावर सध्या पुसदचे नाईक घराणे आणि राज्यमंत्री राठोड यांचा प्रभाव आहे. परंपरागत मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. 

कारण बहुजन वंचित विकास आघाडीचा उमेदवारही बंजारा मतांमध्ये आपला दावा ठोकेलच. अशातच ‘बसप’चा उमेदवार कोण, यावर मतांच्या विभाजनाची तीव्रता अवलंबून असेल.

प्रश्‍न मतदारसंघाचे
वर्धा-नांदेड लोहमार्गाचे काम कूर्मगतीने
अपूर्ण सिंचन प्रकल्प, दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी त्रस्त
कापसावर आधारित प्रकल्पांची वानवा
उद्योगांचा अनुशेष आणि बेरोजगारीची समस्या

२०१४ चे मतविभाजन
भावना गवळी (शिवसेना) - ४,७७,९०५ (विजयी)
शिवाजी मोघे (काँग्रेस) - ३,८४,०८९
बळीराम राठोड (बीएसपी) - ४८,९८१
राजू पाटील राजे (मनसे) - २६,१९४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com