आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना नातेवाईकांनी दिली ही अजब शिक्षा...
अमरावती : वरुड तालुक्यातील एका गावात प्रेमविवाह करणाऱ्या युवक आणि युवतीला पोलिसांनी अमरावतीतून क्वारंटाइन केल्याचा धक्कादायक प्रकार संबंधित कुटुंबाच्या तक्रारीनंतर समोर आला.
वरुड तालुक्यातील 24 वर्षीय युवक आणि 21 वर्षीय युवतीने 21 तारखेला अमरावतीत पळून येऊन एका विवाहमंडळात नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह केला. मात्र, युवक-युवती आंतरजातीय असल्याने त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातून अमरावती येथील सातुर्णा भागात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आश्रय घेतला.
दरम्यान हा आंतरजातीय विवाह अमान्य असलेल्या युवतीच्या नातेवाइकांनी पोलिसांची मदत घेऊन संबंधित युवकाच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या माध्यमातून अमरावती येथील त्यांच्या मुलीचे घर गाठले. युवक-युवतीला ताब्यात घेण्यात आले.
तसेच संबंधित युवक आणि युवती हे अमरावती महापालिका क्षेत्रात कन्टोन्मेंट क्षेत्रात वास्तव्यास होते, असे सांगून त्यांना वरुड तालुक्यात क्वारंटाइन करून ठेवल्याची धक्कादायक तक्रार युवकाच्या आई-वडिलांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे गुरुवारी केली. यासंदर्भात मदतीसाठी आमदारांकडे धाव घेतली असता त्यांनीही सहकार्य करण्यास असमर्थता दर्शविल्याचे युवकाच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.