युवा शेतकऱ्याने संपविले जीवन

युवा शेतकऱ्याने संपविले जीवन

वरुड (जि. अमरावती) : कशीबशी तग धरून असलेली कपाशी पाण्याच्या ओढीने सुकण्याच्या अवस्थेत असल्याचे बघून चिंतातुर झालेल्या एका युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या तीन दिवसांत तीन आत्महत्या झाल्याने दुष्काळ, नापिकी व कर्जाच्या भाराखाली शेतकऱ्यांचे जीवन निराशेच्या गर्तेत गेल्याचे दिसून येते.
वरुड तालुक्‍यातील गोरेगाव येथील युवा शेतकऱ्याने गुरुवारी (ता. 26) स्वतःच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय पद्माकर ठाकरे (वय 31), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. महिन्याभरापूर्वी आलेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली. विजयनेही आपल्या शेतात कपाशीची लागवड केली. बियाणे अंकुरले. कपाशीचे पीक जोम धरू लागले. मात्र, पावसाने दांडी मारली. शेतातील उभे पीक पावसाअभावी कोमेजू लागले. सर्वच शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. विजयनेही पेरलेली कपाशी कोमेजू लागली. गुरुवारी दुपारी शेतात गेल्यावर कर्ज काढून केलेली पेरणीची अवस्था पाहून विजय निराश झाला. शेतातून दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्याने घरातच आड्याला दोरीने गळफास घेतला.
तीन दिवसांत तीन आत्महत्या
गेल्या तीन दिवसांतील तिसऱ्या आत्महत्येची नोंद शासनदरबारी झाली. यापूर्वी 23 जुलैला पुसला येथील प्रदीप चिमोटे व 24 जुलैला शहरातील ब्राह्मणपुरी परिसरातील आशीष लव्हाळे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. तीन दिवसांत तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्येने शेतकऱ्यांसमोरील आव्हाने अधिकच गडद झाल्याचे अधोरेखित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com