बाळकृष्ण मधाळे
मुंबई : २० वर्षांपूर्वीचा तो दिवस… २६ जुलै २००५. महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी कोरला गेलेला दिवस.
आभाळ फाटल्यागत (26 July Mumbai Flood 2005) कोसळणारा पाऊस, अंगावर शहारे आणणाऱ्या दरडी, पुरात वाहून जाणारी गावं, नष्ट होणारी माणसं आणि तरीही हातात हात घालून एकमेकांना वाचवणारे मुंबईकर… ही सगळी दृश्यं आजही जिवंत आहेत.
त्या अतिवृष्टीने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात हाहाकार माजवला. मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे महामार्ग बंद पडले, रेल्वे मार्ग जलमय झाले, हवाई वाहतूकही ठप्प झाली होती.
मुंबईसह महाड, खेड, चिपळूणसारखी कोकणातील अनेक शहरे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. दरडी कोसळून शेकडो लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोक बेघर झाले.
हजारो नागरिक ऑफिसमधून घरी जाण्याच्या प्रयत्नात रात्रभर रस्त्यावर अडकून पडले होते.
एका क्षणाला वाटत होतं, ही मुंबई आहे का, की समुद्रानं गिळलेलं एखादं शहर? काॅलनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे मार्ग जलमय झाले होते. याचा फटका प्रवाशांना बसला, घरी परतण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.
अतिवृष्टीमुळे हवामान खात्याने शाळांना सुट्टी जाहीर केली; तरीही शेकडो शाळांमधील विद्यार्थी शाळेतच अडकले. शिक्षकांनीच त्यांना अन्न-पाण्याची सोय करून दिली होती.
त्या दिवशी मुंबईकरांनी ज्या संकटाला सामोरं गेलं, ते शब्दांत मांडणं अशक्य आहे. पावसात काहींची कुटुंबं उद्ध्वस्त झाली तर, काहींच्या घरात पाणी शिरुन मोठे नुकसान झाले होते.
ऑफिसमधून घरी जाण्याच्या प्रयत्नात काही लोक रस्त्यावर अडकून पडले होते. पावसामुळे त्यांच्या गाड्या बंद पडत होत्या.
या पावसामुळे बससेवाही पूर्णपणे ठप्प झाली होती, त्यामुळे घरी परतणाऱ्या नागरिकांना अख्खी रात्र बसमध्ये झोपून काढावी लागली.
२० वर्षं उलटून गेली, तरी त्या पुराच्या जखमा आजही जिवंत आहेत. त्या दिवशी हरवलेले आपल्या माणसांचे चेहरे आजही डोळ्यासमोर येतात. अनेक घरांनी आपले आधार गमावलेत.