सकाळ डिजिटल टीम
सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक फळ मानले जाते. मात्र, त्याच्या गोड गरामागे लपलेले बी खरोखरच घातक ठरू शकतात का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. चला तर मग याचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊ..
सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन (Amygdalin) नावाचे एक नैसर्गिक रसायन असते. शरीरात हे रसायन सायनाइडमध्ये रूपांतरित होऊ शकते. सायनाइड (Cyanide) हे अत्यंत विषारी आणि प्राणघातक मानले जाते.
जर एखाद्याने या बिया चघळून खाल्ल्या तरच अमिग्डालिन सक्रिय होऊन सायनाइड तयार करू शकते. मात्र, जर बिया फोडल्या किंवा चघळल्या नाहीत आणि सरळ गिळल्या, तर त्या शरीरातून न पचता बाहेर टाकल्या जातात.
प्रत्येक सफरचंदात सुमारे ५ ते ८ बिया असतात. या प्रमाणात सायनाइड तयार होण्याची शक्यता कमी असते. संशोधनानुसार, सुमारे २०० बिया चघळून खाल्ल्यास प्राणघातक सायनाइडचे प्रमाण शरीरात जाऊ शकते. म्हणजे, जवळपास ४० सफरचंदांच्या बिया चघळून खाल्ल्याशिवाय धोका कमी आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रोज एखाद-दोन बिया गिळल्याने धोका नाही. पण शक्यतो बिया खाणे टाळावे. विशेषतः बिया चघळून खाणे टाळा, कारण त्यामुळे विषारी घटक सक्रिय होतात.
सफरचंदासोबतच पीच, चेरी, जर्दाळू यांच्या बियांमध्येही अशाच प्रकारची विषारी रसायने असतात. त्यामुळे अशा फळांच्या बिया खाताना सतर्क राहणे गरजेचे आहे.
जर एखाद्याने खूप जास्त प्रमाणात बिया खाल्ल्या तर श्वास घेण्यास अडचण, उलटी, चक्कर, बेशुद्ध होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. अशावेळी त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
सफरचंदाच्या बिया फार मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास शरीराला धोका संभवतो; पण दररोज एक-दोन बिया चुकून गिळल्यास घाबरण्याचे कारण नाही. तरीही सुरक्षिततेसाठी बिया न खाणे हेच शहाणपणाचे ठरेल.