सकाळ डिजिटल टीम
आयुर्वेद म्हणजे केवळ औषधोपचार नव्हे, तर आरोग्यपूर्ण आणि संतुलित जीवनशैलीचा मंत्र आहे. या शास्त्रात काही सोप्या, पण प्रभावी सवयी सुचवल्या आहेत. या सवयी अंगीकारल्यास तुम्ही दीर्घकाळ तरुण, ताजेतवाने आणि आजारांपासून मुक्त राहू शकता.
आयुर्वेदानुसार, सूर्योदयापूर्वी ४५ मिनिटे आधी, म्हणजेच ब्रह्म मुहूर्तामध्ये उठावे. या वेळी उठल्यास शरीराला नवीन ऊर्जा, चैतन्य आणि मानसिक शांती मिळते. दिवसभराची कार्यक्षमता आणि एकाग्रता यामध्ये लक्षणीय सुधारणा होते.
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास आम्लपित्त वाढते आणि पचनसंस्था बिघडते. त्यामुळे नेहमी चहा किंवा कॉफी नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतरच घ्या.
पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. ताजे शिजवलेले अन्न पचनासाठी सोपे असते आणि चयापचय क्रिया (Metabolism) सुदृढ बनते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात व शरीर हलके आणि ऊर्जावान राहते.
शिजवलेले आणि कच्चे अन्न एकत्र खाल्ल्यास पचनसंस्था गोंधळते. शिजवलेले अन्न सहजपणे पचते, तर कच्च्या अन्नासाठी वेगळ्या एंजाइम्सची गरज असते. त्यामुळे फळे, कोशिंबीर आणि शिजवलेले अन्न वेगवेगळ्या वेळी खाणे फायदेशीर आहे.
आहाराचे वेळापत्रक पाळणे खूप महत्त्वाचे आहे. एकदा जेवल्यानंतर किमान ३ तासांचे अंतर ठेवावे. यामुळे पचन व्यवस्थित होते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते. दिवसातून तीन वेळा संतुलित आहार घेणे आदर्श आहे.
आयुर्वेदाच्या या सोप्या आणि प्रभावी नियमांचे पालन केल्यास तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसाल, शरीर व मन निरोगी राहील आणि अनेक गंभीर आजारांपासून मुक्त राहाल.