सकाळ डिजिटल टीम
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : केवळ देशभरातच नाही, तर अवघ्या विश्वभरात भारतीय राज्यघटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी मोठ्या दिमाखात जयंती साजरी केली जाते.
आज एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरी करण्यात येणाऱ्या या भिम जयंतीचा उत्सव नक्की कधीपासून सुरू झाला? कुठे सुरू झाला? आणि कोणी सुरू केला? असा प्रश्न आपल्या मनात आला असेल.
डॉ. आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कुठे साजरा झाला? असा प्रश्न आल्यानंतर नक्कीच मुंबई, नागपूर, महू इत्यादी शहरांचा विचार आपल्या मनात आलाच असेल. मात्र, तसे अजिबात नाही.
डॉ. आंबेडकरांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे शहरात १४ एप्रिल १९२८ रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला. यामुळे ते या भीम जन्मोत्सवाचे शिल्पकारच ठरले.
जयंतीची ही प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकीच्या पत्र विभागात दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत, त्यांनी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा चक्कं हत्तीच्या अंबारीत ठेवली होती.
यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून आणि उंटावरून मोठ्या मिरवणुका काढल्या होत्या.
जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते अशी जनार्दन रणपिसे यांची ओळख आहे. रणपिसे यांचा जन्म सासवड येथे २४ ऑगस्ट १८९८ या साली झाला.
ज्या काळात दलितांनी शिक्षण संपादन करणेच एक मोठे दिव्य होते, अशा काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले. यातच त्यांचे मोठेपण आहे.
विशेष म्हणजे, महार सेवादलाची स्थापनाही त्यांनी केली. या दलाचे कमांडर इन चीफ बनले. राजकारणात ते फारसे सक्रिय राहिले नाहीत. पण, सामाजिक कार्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे.
महात्मा गांधींनी पुण्यात उपोषण सुरू केले होते. या दरम्यान बाबासाहेब पुण्यात येणार होते. त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता. त्यावेळी रणपिसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजावली होती.