सकाळ डिजिटल टीम
मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) या नावाचा उल्लेख करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १२ डिसेंबर १९५५ च्या पत्रात असं लिहिलंय की, "ह्या कॉलेजला मिलिंद हे नांव देण्याचा माझा उद्देश हा आहे, की मिलिंद हा एक बॅक्ट्रियाचा ग्रीक राजा होता. त्याला आपत्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती.
त्याला असे वाटे की, ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत. आपल्या बुध्दिमत्तेचा मिलिंदला गर्व चढला होता. तो सर्वांना वादविवादाने आव्हान देत असे. त्याने जगाला आव्हान दिले.
त्याला वाटले की, आपण एखाद्या बौद्धभिक्खु बरोबर वाद करावा; पण त्याच्याबरोबर वाद करावयास कोणीही तयार झाला नाही. तसा मिलिंद हा काही तत्त्वज्ञानी नव्हता किंवा गाढा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते.
पण, अशा मिलिंद बरोबर बुध्दीवाद करण्यास कोणीही तयार होईना. ह्याची बौध्दांना लाज वाटली व वाईटही वाटले. नंतर महान, प्रयासाने त्यांनी नागसेन भिक्खुला तयार केले. मिलिंदाचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे, असा नागसेनाने निश्चय केला.
मग, त्यात यश येवो किंवा अपयश येवो. नागसेन हा ब्राम्हण होता. वयाच्या सातव्या वर्षी त्याने आपल्या आई-बापाचे घर सोडले होते. त्याने विद्येच्या, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अतिशय कष्ट घेतले. तो अत्यंत विद्वान होता.
नागसेनाने भिक्खुचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद झाला. त्यांचा वादविवाद कैक दिवस चालू होता, ह्या वादविवादाचे एक पुस्तक तयार झाले. त्या पुस्तकाला पाली भाषेत "मिलिंद पञ्हों" असे नांव आहे. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर 'मिलिंद प्रश्न' असे आहे.
या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे, अशी माझी इच्छा आहे. शिक्षकांच्या अंगी व विद्यार्थ्यांच्या अंगी काय गुण असावेत हे त्यात सांगितले आहे. म्हणून, मी ह्या कॉलेजला 'मिलिंद महाविद्यालय' हे नाव दिले व परिसराला "नागसेनवन" असे नांव दिले, असे बाबासाहेब सांगतात.
वादविवादात मिलिंद हरला. त्याचा पराजय झाला. तो बुध्दधर्मी झाला; पण मिलिंद हरला व बुध्द झाला म्हणून मी हे नाव दिलेले नाही, तर मिलिंद हा मला त्याच्या "INTELLECTUAL HONESTY" बद्दल प्रिय वाटतो. त्याचा हा आदर्श सर्वांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावा म्हणून हे नांव दिलेले आहे. हे आदर्शभूत असेच आहे, असे माझे मत आहे.
उत्तम विद्यार्थी म्हणून मिलिंद व उत्तम शिक्षक म्हणून नागसेन हे आदर्श आहेत. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापा-याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नांव शिक्षण संस्थेला देणे हे अत्यंत अनुचित होय. मी ह्या संस्थेसाठी पुष्कळ नुकसान सोसले; पण कोण्या व्यक्तिचे नांव दिले नाही.
तसे मला सुध्दा आदर्श नांव आहे, पण मला मिलिंदचा आदर्श आपल्या समोर ठेवावयाचा आहे. मिलिंद महाविद्यालय एक संस्कारकेंद्र आहे. यामधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कृत होऊन बाहेर पडला पाहिजे, असेही डॉ. आंबेडकरांनी यावेळी नमूद केले.