सकाळ डिजिटल टीम
जीवनात अनकेदा काही प्रसंग चित्रपटासारखे घडत असतात, तर काहीवेळा जे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात, तेच चित्रपटात पडद्यावर झळकताना दिसतात.
सन 1999 मध्ये प्रदर्शित झालेला आमीर खानचा सरफरोश चित्रपट तुम्हाला आठवत असलेच. या सिनेमाने प्रेक्षकांची खूप वाहवा मिळवली होती.
याच सरफरोश चित्रपटातील आमीर खान एका प्रसंगाप्रमाणेच कोल्हापूरच्या युपीएससी (UPSC) क्रॅक केलेल्या बिरदेव डोणेची कथा आहे.
ज्या बिरदेव ढोणेची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही, तो बिरदेव डोणे आज आयपीएस अधिकारी बनला आहे, हे विशेष!
'सरफरोश'मध्ये आपल्यावरील अन्यायाची तक्रार देण्यासाठी आमीर खान पोलीस स्टेशनला जातो; पण पोलिस त्याला कसलीच दाद देत नाहीत. व्यवस्थेबदलचा हा संताप त्याच्या मनाला चटका देतो आणि पुढे आमीर खान IPS अधिकारी बनतो.
कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बिरदेव डोणेच्या यशातही अशाच कित्येक संघर्षमय गोष्टींचा साठा आहे.
युपीएससी परीक्षेतून आयपीएस झाल्यानंतर बिरदेवने आयुष्याचा खडतर प्रवास सांगितला, त्यातील एक घटना ही आमीर खानच्या सरफरोश सिनेमातील दृश्याप्रमाणेच म्हणता येईल.
युपीएससीची मुलाखत दिल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी येथील अभ्यास केंद्रावरुन जात असताना रात्री 11 वाजता राधिका भेळ येथून माझा फोन चोरीला गेला. माझा फोन चोरीला गेला ही गोष्ट मी अद्यापही घरी सांगितली नाही.
घरी सांगितलंय, की माझा फोन बंद पडलाय; पण खरं तर माझा फोन चोरीला गेलाय. त्यामुळे, आजही माझ्या बीडच्या मित्राचा फोन मी वापरत आहे, असं बिरदेवनं सांगितलं.
फोन चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला कसलाच भाव दिला नाही, माझी तक्रारही घेतली नाही, असंही बिरदेवने एका मुलाखतीत सांगितलंय.
बिरदेव सिद्धापा डोणेने यूपीएससी परीक्षेत देशात 551 वा क्रमांक मिळवलाय. विशेष म्हणजे, निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीत मेंढ्या घेऊन गेला होता.