Monika Shinde
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आनंदाची आणि सोपी बातमी दिली आहे.
आता तुम्हाला तुमच्या तिकीटाची खात्री प्रवासापूर्वी केवळ 4 तासाऐवजी पूर्ण 24 तास आधी मिळणार आहे. यामुळे शेवटच्या क्षणी तिकीट कन्फर्म होईल की नाही याची चिंता न करता तुम्ही आधीच योग्य तयारी करू शकता.
6 जूनपासून बीकानेर विभागात या नव्या नियमाचा ट्रायल सुरू झाला असून, पहिल्या चार दिवसांतच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
बीकानेर येथील यशस्वी प्रयोगानंतर रेल्वे हा नियम दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात अशा मोठ्या आणि व्यस्त मार्गांवरही लागू करण्याच्या तयारीत आहे, जिथे वेटिंग लिस्ट प्रामुख्याने लांब असते.
रेल्वे मंत्र्यांच्या बीकानेर भेटीनंतर रेल्वेने अतिरिक्त कोच जोडण्याची आणि क्लोन ट्रेन चालवण्याची योजना अधिक व्यवस्थित आखली आहे.
24 तास आधी तिकीट कन्फर्म होण्यामुळे रेल्वेला हे नियोजन वेळेत करता येणार आहे.
तिकीट कन्फर्मेशन आधी मिळाल्यामुळे शेवटच्या वेळेचा ताणतणाव कमी होईल. प्रवाशांना वेळेत पर्याय निवडण्याची संधी मिळेल. रेल्वेला प्रवाशांची खरी संख्या समजून घेऊन योग्य सेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल.
सध्या वेटिंग लिस्टचा अंतिम चार्ट फक्त प्रवासापूर्वी ४ तास आधी तयार होतो, ज्यामुळे अतिरिक्त कोच जोडणे किंवा पर्यायी उपाययोजना करणे कठीण होते.