Shubham Banubakode
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात, भीमा नदीच्या उत्तर तीरावर 110 एकरांवर पसरलेला पांडे-पेडगांवचा भुईकोट किल्ला 13व्या शतकात बांधला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे या किल्ल्याच्या देखभालीची जबाबदारी निजामशहाने सोपवली होती.
निजामशाहीकडून मोगलांनी हा किल्ला जिंकला आणि औरंगजेबाचा दुधभाऊ बहादूरखान कोकलताश याच्याकडे त्याची जबाबदारी आली. याच काळात किल्ल्याचे नाव ‘बहादूरगड’ असे झाले.
1674 मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आर्थिक रसद मिळवण्यासाठी त्यांनी पेडगांवच्या किल्ल्यावर हल्ला केला.
2008 मध्ये या किल्ल्याचे नाव ‘धर्मवीरगड’ असे ठेवण्यात आले, कारण येथेच छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. संगमेश्वर येथे अटक झाल्यानंतर त्यांना याच किल्ल्यावर आणले गेले.
संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर या किल्ल्याच्या राजदरबारात उभे केले गेले. येथे त्यांनी औरंगजेबाचा धर्मांतराचा प्रस्ताव नाकारला आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिले.
किल्ल्याच्या तटबंदीजवळील राजदरबारात मुघल शैलीतील चुनेगच्ची आणि वीटांचे दुमजली बांधकाम आहे.
किल्ल्यावर चालुक्यकालीन श्री लक्ष्मीनारायण, गजलक्ष्मी, बालेश्वर, मल्लिकार्जुन, रामेश्वर, पाताळेश्वर आणि भैरवनाथ मंदिरांचे अवशेष आहेत.
किल्ल्याच्या उत्तर दरवाजातून प्रवेश केल्यानंतर समोर शौर्यस्तंभ आहे, जिथे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना औरंगजेबासमोर उभे केले गेले.
धर्मवीरगड आज दुर्गसंवर्धनामुळे पुन्हा इतिहासाशी जोडला गेला आहे. परंतु त्याच्या जतनासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.