सकाळ डिजिटल टीम
कर्नाटकमधील हंपी, ज्याला विजयनगर म्हणूनही ओळखलं जातं. हे भारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नेत्रदीपक पुरातत्त्वीय स्थळ आहे.
तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेली ही प्राचीन नगरी मंदिरं, राजवाडे, चौक, मनोरे, पूल आणि भव्य मूर्ती यांचं अफाट दृष्य सादर करते.
हंपीचं नैसर्गिक सौंदर्यही तितकंच अद्वितीय आहे. प्रचंड खडक, डोंगररांगा आणि पाण्याच्या प्रवाहांनी वेढलेली ही जागा एक वेगळाच अनुभव देते.
विशेष म्हणजे, येथे कोणताही कृत्रिमपणा नाही. पुरातत्त्व विभागाने कोणतीही सजावट केली नसून, सर्व स्मारकं त्यांच्या मूळ नैसर्गिक अवस्थेत आजही उभी आहेत.
हंपीचं महत्त्व पौराणिकदृष्ट्याही मोठं आहे. रामायणामधील किष्किंधा नगरी म्हणजेच आजचं हंपी, असं मानलं जातं. येथेच प्रभू रामाला वानरसेनेने रावणाकडून सीतेला परत मिळवण्यासाठी मदत केली होती.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं, तर 14 व्या ते 16 व्या शतकात हे विजयनगर साम्राज्याची राजधानी होतं. एक शक्तिशाली, संपन्न आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध राज्य.
1565 मध्ये दक्षिण भारतातील मुस्लिम सुलतानांच्या संयुक्त आक्रमणात विजयनगरचा पराभव झाला आणि त्यानंतर हंपीचं वैभवशाली अस्तित्व ओसरलं. परंतु, आजही ही नगरी इतिहासाच्या पाऊलखुणा जपून उभीये.
हंपीचा परिसर प्रचंड मोठा आहे. इथं तासन्तास भटकंती करता येते आणि अनेकदा एखादं कोपऱ्यातील मंदिर किंवा अवशेष शोधून काढणं हा एक शोधमोहिमेसारखा अनुभव असतो.
संपूर्ण हंपी पाहण्यासाठी काही दिवस हवेत, पण तीन दिवसांत प्रमुख स्थळं पाहून समाधानकारक अनुभव घेता येतो आणि त्यात कंटाळाही येत नाही.