सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराला आराम देणारा आणि चवीलाही तितकाच अप्रतिम वाटणारा पदार्थ म्हणजे कोहळ्याचा पेठा. जसा आग्र्याचा ताजमहाल जगप्रसिद्ध आहे, तसाच कोहळ्यापासून बनवलेला पेठाही गोड-खवय्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
कोहळा (Ash Gourd) ही एक वेलीवर उगम पावणारी फळभाजी आहे, जी आयुर्वेदात 'शीत' गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. हाच थंडावा रक्तातील उष्णता कमी करण्यास मदत करतो.
विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत नाकातून रक्त पडणे, उष्णतेमुळे चिडचिड किंवा त्वचेचे विकार यावर कोहळा अत्यंत उपयोगी आहे.
कोहळ्यात जवळपास ९६.५ टक्के पाण्याचे प्रमाण असल्याने, तो शरीराला आवश्यक असलेला ओलावा आणि थंडावा प्रदान करतो. मात्र लक्षात घ्या, कोहळ्याचा पेठा करताना त्यातील पाणी काढले जाते, त्यामुळे आरोग्य लाभासाठी कोहळ्याचा रस थेट पिणे अधिक फायदेशीर ठरते.
कोहळा केवळ थंडावा देणारा नाही तर निद्रानाश, वाईट स्वप्नं, मलावरोध व मूत्र जळजळ यासारख्या त्रासांवरही प्रभावी आहे. त्याचा नियमित वापर मूत्राशय स्वच्छ ठेवतो, लघवी स्वच्छ होते आणि पचनक्रिया सुधारते.
कोहळा हा बलवर्धक, वीर्यवर्धक आणि हृदय व केसांसाठी पोषक असल्याचे आयुर्वेद सांगते. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर परिणाम करणाऱ्या मोजक्या घटकांमध्ये कोहळा अग्रस्थानी आहे.
उत्तर भारतात कोहळ्याचा पेठा गुलाब पाकळ्यांसोबत खाण्याची परंपरा आहे. हे संयोजन शरीरात थंडावा वाढवते आणि चवीलाही अप्रतिम असते.
थोडक्यात सांगायचं झालं, तर कोहळा हे गोडसर, थंडावादायक आणि आरोग्यवर्धक फळ असून उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर घरगुती उपाय ठरू शकतो. त्याचा पेठा खाण्यासाठी तर रस पिण्यासाठी जरूर विचार करा!