संतोष कानडे
राज्यसभेतील एकूण सदस्यसंख्या २५० इतकी आहे. त्यात २३८ सदस्य हे संघराज्यातून येतात तर १२ सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात.
प्रत्येक राज्याची राज्यसभेतील संख्या ही त्या राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर ठरलेली असते. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण १९ जागा आहेत.
राज्यसभेत निवडून जाणाऱ्या उमेदवाराला त्या राज्याच्या विधानसभेतील विद्यमान सदस्यांचे मतदान आवश्यक असते.
ही मतदान प्रक्रियाएकल हस्तांतर पद्धतीने केली जाते. महत्त्वाचं म्हणजे मतदान गुप्त पद्धतीने होत नाही.
विधानसभा सदस्यांनी राज्यसभा उमेदवारांना दिलेला पसंतीक्रमांक पक्षाकडून तपासला जातो.
महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. हे सर्व आमदार राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र ठरतात.
राज्यसभेत महाराष्ट्रातून एकूण 19 जागा आहेत. त्यापैकी एक तृतीयांश जागांसाठी दर दोन वर्षांनी मतदान होते.
म्हणजेच 6 जागांसाठी निवडणुका होत असतील, तर 288 पैकी विजयी होण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा ठरवण्यासाठी एक विशिष्ट फॉर्म्युला वापरला जातो.
त्यासाठी एकूण मतदारांच्या संख्येला निवडणुकीच्या एकूण जागांची संख्या अधिक एक ने भागायचे, त्यानंतर आलेल्या संख्येमध्ये अधिक 1 चा समावेश केल्यानंतर जी संख्या प्राप्त होते. ती संख्या म्हणजे उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेले मतदान होय.
महाराष्ट्रात 288 विधानसभा आमदार मतदानादासाठी पात्र असतील आणि 6 जागांसाठी मतदान होत असले तर 6+1= 7 ने त्या संख्येस भागायचे. (288/7=41+1 = 42) अशी विजयी मतांची संख्या निश्चित होईल.
विधानसभा सदस्य आपले मतदान हे एकल हस्तांतर पद्धतीने करतात. यामध्ये मतदारांना उमेदवारांच्या निवडीसाठी प्राधान्य क्रमांक देणे आवश्यक आहे.
सदस्य प्रत्येक उमेदवाराला (1, 2, 3, 4, 5, 6 ) असे प्राधान्य देतात. एकूण मतांपैकी 42 किंवा त्याहून अधिक सदस्यांनी उमेदवाराची पहिली पसंती म्हणून ज्याची निवड केली जाते तो निवडून येतो.
समजा एखाद्या उमेदवारास 50 प्रथम क्रमांकाची मते मिळाली, तर तो उमेदवार 42 मते घेऊन विजयी होईल.
मात्र, त्यांची उर्वरित 8 मते ही संबंधित मतदारांनी ज्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमाकांची पसंती दिली आहे. त्याच्याकडे हस्तातंरित होतात. म्हणजेच संबंधित पक्षाच्या मतदारांच्या कोट्यातून त्यांचा दुसरा उमेदवारही निवडून येण्यास मदत होते.