संतोष कानडे
बिबट्यांची संख्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही गावांमध्ये तर रात्री घराबाहेर पडणं अवघड झालेलं आहे.
त्यामुळे वन विभागावर बिबट्या पकडण्यासाठी ताण वाढत आहे. मात्र यामुळे संकट कमी होण्याऐवजी वाढताना दिसतंय.
वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका स्टडीमध्ये बिबट्यांबाबत एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे.
एखाद्या ठिकाणाहून अनावश्यकपणे बिबट्या पकडून नेला तर त्या ठिकाणी इतर तीन बिबटे दाखल होतात.
प्राणीमित्र नचिकेत उत्पात यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं की, केवळ बिबट्या दिसलाय म्हणून प्रेशर निर्माण करणं योग्य नाही.
असं केलं तर तिथे वेगळे दोन-तीन बिबटे येऊ शकतात. कारण जो पकडलाय तो तिथेच सेटल झालेला प्राणी असतो.
ती जागा रिकामी झाली तर तिथे नवखे दोन-तीन बिबटे येऊन आपली हद्द निर्माण करु शकतात.
जर मादी पकडली तर त्या तिच्या पिल्ल्यांचं शिक्षण अर्धवट रहातं आणि हे पिल्ले घातक ठरु शकतात.
त्यामुळे बिबट्याशी जुळवून घेणं जास्त आवश्यक आहे. वन विभागाकडूनही अशा पद्धतीने जनजागृती केली जाते.
जिथे मात्र फारच आवश्यकता आहे आणि माणसांवर हल्ले झालेल्या किंवा जीव गेलेल्या घटना घडल्या आहेत, तिथे मात्र पकडणं गरजेचं ठरु शकतं.