संतोष कानडे
छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी अफाट होती. त्यामुळे त्यांनी स्वराज्याचं आरमार उभं केलं आणि त्या जोरावर सुरक्षा यंत्रणा उभी केली.
स्वराज्याच्या आरमारात अनेक प्रकारच्या नौका आणि जहाचं होती. या नौका संगमेश्वरात बांधल्या जाऊ लागल्या.
निढळेवाडी इथल्या सुतार समाजाच्या लोकांनी 'संगमेश्वरी नौका' बांधण्याचं काम केलं.
अगदी चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत इथले लोक हे पारंपारिक काम करायचे. हे गाव संगमेश्वरापासून पाच किमी अंतरावर आहे.
गावाचं मूळ नाव वाडा निढळ असं होतं. शिवरायांनी सुतार समाजाला गाव आंदण दिलं. गुहागरजवळच्या जामसूद इथून या मंडळींना महाराजांनी येथे बोलवून घेतलं होतं.
या नौका पूर्णपणे लाकडात बांधलेल्या असायच्या. नौकांना खिळा किंवा लोखंडी वस्तू वापरली जात नसे.
प्रत्येक लाकडी खाचेमध्ये इंग्रजी N आकाराची खुंटी ठोकली जायची. हे लाकूड नागपूर, गोंदिया किंवा मध्य प्रदेशातून आणलं जायचं.
पाण्यात, लाटेत, वादळात नौका टिकून रहावी, यासाठी विशिष्ट तंत्र वापरलं जात असे. नौकेला आतून विशिष्ट तेलाचा कोट दिला जायचा.
विशेष म्हणजे लाकडी फळी गरम करुन तिला पीळ देऊन कोन तयार केला जात असे. त्यामुळे ही नौका समुद्राला टक्कर द्यायला तयार असायची.
सुरुवातीला इंग्रजांनी अशा नौकांची चेष्टा केली. मात्र याच नौकांच्या जौरावर महाराजांनी शत्रूंना सळो की पळो करुन सोडलं.
पुढे कान्होजी आंग्रे यांच्या कार्यकाळात मराठा नौदलाने किनारपट्टीवर वर्चस्व निर्माण केलं. मग इंग्रजांनाही या नौकांची भूरळ पडली.
आज नौका बनवण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी गावामध्ये वारसा टिकून आहे. हा प्रकल्प आजही आहे, तिथे पर्यटकांनी भेट देणं गरजेचं आहे.