संतोष कानडे
काळ्या जमिनीवर जेव्हा वसाहतीला सुरुवात झाली तेव्हापासून पाटीलकीचा उदय झाला, असं स्थूलमानाने म्हटलं जातं.
सर्व पडीक जमीन लागवडीखाली आणून तिच्यातून धान्योपादन करणे हे पाटलाचे मुलभूत कर्तव्य होते.
शिवाजी महाराजांच्या काळात दादाजी कोंडदेव यांनी जहागिरीतील सर्व पडीक जमीन लागवडीखाली आणण्याच्या अटींवर पाटीलकी देऊ केली होती.
पाटलास दंडाधिकाऱ्याचे अधिकार असत. छोटे-मोठे गुन्हे हाताळणे, त्यांचा तपास करणे, कानउघडणी करणे, शिक्षा देणे ही कामे पाटलांची होती.
पाटलास द्रव्यरुप दंड आकारण्याचा अधिकार नव्हता. गंभीर गुन्हा घडल्यास, त्याविषयी पाटलाला सरकारात खबर द्यावी लागे.
न्यायाधिकार म्हणून पाटलांची कर्तव्ये न्यायाधिशांची नसून गावकामगारांची होती. वादी-प्रतिवादीमध्ये समेट घडवून आणण्याचं त्यांचं कर्तव्य असे.
विशेषतः ब्राह्मण आणि मराठ्यांनी पाटीलकी सांभाळलेली आहे. पाटीलकीचे वतन राजाकडून प्राप्त होत असे किंवा विकतही घेता येत असे.
पाटलास पाटील, गाव पाटील, मोकादम पाटील, मोकादम, ग्रामणी, ग्रामप असा उल्लेख मराठी साधनांमध्ये आढळतो.
राज्य व्यवहार कोशांत पाटलास 'ग्रामगोपक' असे म्हटले आहे. त्यास वतनपत्र नावाच्या शासकीय पत्रानुसार आपले पद व सत्ता प्राप्त होई.
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या 'शिवकाल' या पुस्तकात ही माहिती देण्यात आलेली आहे.