Pranali Kodre
बीसीसीआयने २१ एप्रिल रोजी भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या २०२४-२५ वार्षिक मानधन कराराची घोषणा केली आहे.
या करारासाठी १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ हा कालावधी ग्राह्य धरण्यात आला आहे.
या करारात चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये खेळाडूंना विभागण्यात आले असून एकूण ३४ खेळाडूंना हा करार मिळाला आहे.
श्रेयस अय्यर, इशान किशन या खेळाडूंचे वार्षिक करारात पुनरागमन झाले आहे, तर काही खेळाडूंना या करारातून वगळण्यात आले आहे.
गेल्यावर्षी कराराच्या यादीत असणारे, पण यंदा बीसीसीआयने करारातून बाहेर केलेल्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने गेल्यावर्षीच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्याने तो २०२४-२५ कराराचा भाग नाही.
वेगवान गोलंदाज आवेश खान सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआयचा करार मिळालेला नाही. गेल्यावर्षी तो बीसीसीआयच्या करारात सी श्रेणीमध्ये होता.
यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा गेल्यावर्षी बीसीसीआयच्या करारात सी श्रेणीमध्ये होता, पण यावेळी २०२४-२५ च्या करारातून त्याला बाहेर करण्यात आले आहे.
यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत हा देखील गेल्यावर्षी सी श्रेणीमध्ये होता. पण यावेळी त्याला २०२४-२५ च्या करारातून बीसीसीआयने बाहेर केले आहे.
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरही भारतीय संघाचा सध्या भाग नाही. त्यालाही २०२४-२५ च्या करारातून बीसीसीआयने बाहेर गेले आहे. तो गेल्यावर्षी सी श्रेणीमध्ये होता.