Puja Bonkile
अन्नसेवन केल्याने शरीरात शक्ती येते. म्हणून शरीरासाठी अन्नसेवन हे गरजेचे आहे.
मात्र हे अन्न किती घ्यावे हे जाणून घेऊया.
भूक आणि पचनशक्ती लक्षात घेऊन आहाराचे प्रमाण ठरवावे, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.
आहाराचे प्रमाण युक्तिपूर्वक ठरवणे भाग असते, कारण जसे भरपेट खाणे अयोग्य असते, तसेच प्रमाणापेक्षा कमी खाणेही अयोग्य होय.
आहार सिद्धांतामध्ये आहाराची मात्रा महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे आहार योग्य स्वरूपात, योग्य पद्धतीने आवश्यक ते संस्कार करूनच सेवन करणे आवश्यक असते.
हितकर आहार जसा व्यक्तीच्या पोषणाला कारणीभूत असतो, तसाच अहितकर आहार रोगाला निमंत्रण देत असतो.
त्यामुळे स्वास्थ्य टिकविणाऱ्या आहाराचेच सेवन करावे, यामुळे रोगालाही प्रतिबंध होतो.
विधिपूर्वक घेतलेला आहार अग्नीला कार्यक्षम राहण्यास मदत करतो, या उलट चुकीच्या पद्धतीने सेवन केलेल्या आहारामुळे अग्नी नष्ट होतो, परिणामतः अनेक रोगांना आमंत्रण मिळते.
निरोगी, यशस्वी व सुखी आयुष्य जगायचे असेल तर आहाराची योजना व्यवस्थित केली पाहिजे.