Mansi Khambe
७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानवर आणि पाकिस्तान प्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले होते. या लढाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले.
या भारतीय हल्ल्यांमध्ये मुलांसह २६ पाकिस्तानी नागरिक ठार झाले असून ४६ हून अधिक लोक जखमी झाले. भारताने सुरु केलेले 'ऑपरेशन सिंदूर'चे जगभरातून कौतुक करण्यात आले.
ऑपरेशन सिंदूरसाठी सैनिकांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती. मात्र यात केवळ सैनिकच नव्हे तर एका १० वर्षीय चिमुकल्याचाही सहभाग होता.
श्रवण सिंग असे मुलाचे नाव असून भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूरचा सर्वात तरुण नागरी योद्धा' म्हणून घोषित करून त्याला सन्मानित केले आहे.
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील तारा वाली गावात ऑपरेशन सिंदूरची तयारी सुरु होती. या तणावपूर्ण वातावरणात तेथे दहा वर्षांचा एक मुलगा उभा होता.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जेव्हा सैनिक गावात तळ ठोकून होते, तेव्हा श्रवण दररोज दूध, लस्सी, थंड पाणी आणि बर्फ घेऊन सैनिकांमध्ये पोहोचत असे.
श्रवण शेतकरी सोना सिंग यांचा मुलगा आहे. "मला मोठा झाल्यावर सैनिक व्हायचे आहे," त्याच्यासाठी सैनिक हे फक्त रक्षक नव्हते, तर ते त्याचे आदर्श आहेत. असे तो नेहमी सांगायचा.
लष्कराच्या ७ व्या पायदळ विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल रणजित सिंग मनरल यांनी स्वतः श्रवणचा सार्वजनिक सन्मान केला. यावेळी त्याला बक्षिसे, खास जेवण आणि आईस्क्रीम देण्यात आले.
आमच्या शेतात सैन्य तैनात होते. श्रवणने पहिल्या दिवसापासूनच सैनिकांना मदत करायला सुरुवात केली. आम्ही त्याला थांबवले नाही, उलट त्याला प्रोत्साहन दिले, असे श्रवणचे वडील म्हणाले.
या लहान मुलाच्या निस्वार्थ सेवेने केवळ सैन्यालाच प्रेरणा दिली नाही तर संपूर्ण गावाला आणि देशाला हे शिकवले की देशभक्ती वयावर अवलंबून नाही. देशाचे उज्ज्वल भविष्य श्रवण सिंह सारख्या मुलांमध्ये आहे.
जेव्हा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला जाईल तेव्हा रणनीती आणि ताकदीसोबतच एका लहान मुलाच्या सेवेची, धैर्याची आणि समर्पणाची कहाणी देखील सांगितली जाईल. श्रवण सिंह हा देशाच्या सर्वात धाकट्या सुपुत्रांपैकी एक आहे.