संतोष कानडे
भारतामध्ये पिनकोड Postal Index Number प्रणाली सुरु करण्याचं श्रेय जातं ते एका मराठमोळ्या माणसाला. त्यांचं नाव श्रीराम भिकाजी वेलणकर
श्रीराम वेलणकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवे गावचे. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९१५ रोजी झाला. संस्कृतचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती.
वेलणकर यांनी १०५ हून अधिक पुस्तके लिहिली. संस्कृत साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना १९७७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
वेलणकर हे केंद्रीय दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. काम करतानाच त्यांना पिनकोडची युक्ती सुचली.
पत्रावर लोकांचं हस्ताक्षर आणि एकाच नावाची अनेक गावे यामुळे पोस्टमनला अडचणी यायच्या.
यावर उपाय म्हणून वेलणकर यांनी आकड्यांची भाषा वापरण्याचे ठरवले. १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोडची पद्धत सुरु झाली.
वेलणकर यांनी युक्रेन आणि इंग्लंडमधील पोस्टल प्रणालीचा अभ्यास करुन भारतासाठी पिनकोडची सोपी पद्धत तयार केली.
१९७०च्या दशकापर्यंत भारतामध्ये केवळ पत्त्यांवरुन पत्र पोहोचवली जायची. मात्र त्यामुळे अनेक पत्रं चुकीच्या पत्त्यावर पोहोचायची.
आजही बदलत्या काळात पिनकोडचा बोलबाला आहे. पत्र येत नसली तरी कुठल्याही वस्तूच्या डिलिव्हरीसाठी पिनकोडचा वापर होतो.