Monika Shinde
UPSC अर्थात संघ लोक सेवा आयोगाची सिव्हिल सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. पण राजस्थानातील भरतपूर येथील राहणाऱ्या IAS डॉ. अंजू शर्मा यांनी २२ वर्षांच्या वयात पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास करून IAS अधिकारी बनली.
अंजू शर्मा यांना त्यांच्या शालेय शिक्षणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्या १०वीच्या प्री-बोर्ड परीक्षेत नापास झाल्या होत्या. त्यानंतर १२वीतही अर्थशास्त्र विषयात फेल झाल्या.
मात्र त्यांनी हार न मानता स्वतःवर मेहनत घेतली. पुढे त्यांनी BSc मध्ये सुवर्णपदक मिळवले, त्यांनी MBA (मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) पूर्ण करताना UPSC च्या तयारीलाही सुरुवात केली.
साल १९९१ मध्ये, केवळ २२ वर्षांच्या वयात, अंजू शर्मा यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनल्या. त्यांनी सिद्ध केलं की सुरुवातीचं अपयश हे अंतिम यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही.
IAS अंजू शर्मा या गुजरात कॅडरच्या अधिकारी आहेत. त्यांची पहिली नियुक्ती राजकोट येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी गांधीनगर आणि इतर जिल्ह्यांत कलेक्टरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.
आपल्या कार्यक्षमतेमुळे अंजू शर्मा यांना वेळोवेळी बढती मिळत गेली. त्या विशेष सचिव, सचिव, प्रमुख सचिव आणि सध्या अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
IAS डॉ. अंजू शर्मा यांची यशोगाथा हे उदाहरण आहे की शालेय अपयश म्हणजे आयुष्याचं अपयश नसतं. आत्मविश्वास, योग्य दिशा, आणि सतत प्रयत्न हे कोणत्याही यशाचं खरं गमक असतं. त्यांचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणास्थान आहे.