प्रणाली कोद्रे
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने पंजाब किंग्सविरुद्ध 4 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.
या विजयात बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
विराटने या सामन्यात 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली.
विराटने टी20 क्रिकेटमध्ये डावात 50 धावा ओलांडण्याची ही 100 वी वेळ होती.
त्यामुळे विराट टी20 क्रिकेटमध्ये 100 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा जगातील तिसरा, तर भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
विराटने टी20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 378 सामन्यांत 8 शतके आणि 92 अर्धशतके, असे मिळून 100 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
विराटपूर्वी टी20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी असा विक्रम केला आहे. गेलने 110 वेळा, तर वॉर्नरने 109 वेळा टी20 क्रिकेटमध्ये 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे