Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका खेळत आहे.
या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून ऍडलेडला खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
त्यामुळे भारतीय संघ केवळ पाचव्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एक आणि भारतात तीन असे एकूण तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत.
यातील ऍडलेडलाच २०२० मध्ये झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला होता, तर इतर तीन दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
आता विराटला ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीत एक खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने जर या सामन्यात ३३ धावा केल्या, तर तो दिवस-रात्र कसोटीत ३०० धावा पूर्ण करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरेल.
विराटने आत्तापर्यंत भारताचे चारही दिवस-रात्र कसोटी सामने खेळले असून ६ डावात ४६.१६ च्या सरासरीने २७७ धावा केल्या आहेत.
विराटने २०१९ मध्ये कोलकाताला झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशविरुद्ध १९४ चेंडूत १३६ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर विराटने ऍडलेडला २०२० मध्ये दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला, ज्यात त्याने पहिल्या डावात ७४ आणि दुसऱ्या डावात ४ धावा केल्या होत्या.
अहमदाबादला इंग्लंडविरुद्ध विराटने २०२१ मध्ये तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला, ज्यात त्याने ५८ चेंडूत २७ धावा केल्या होत्या.
चौथा दिवस-रात्र कसोटी २०२२ मध्ये बंगळुरूला श्रीलंकेविरुद्ध झाला होता, ज्यात विराटने पहिल्या डावात ४८ चेंडूत २३ आणि दुसऱ्या डावात १६ चेंडूत १३ धावा केल्या होत्या.