Mansi Khambe
गणेशोत्सवातील दहा दिवस लालबागच्या राजाची सगळीकडे चर्चा असते. नवसाला पावणारा या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूर दूरहून येतात. तासंतास रांगेत उभे राहून राजाचे क्षणिक दर्शन घेतात.
मात्र लालबागच्या राजाला नवसाला पावणारा गणपती का म्हटले जाते? यामागे कोणती गोष्ट आणि कोणता इतिहास आहे ते जाणून घ्या.
मुंबईत १९३४ च्या काळात व्यापार मोठ्या प्रमाणात होता. हळूहळू मुंबईत टेक्स्टाईलचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढू लागला. लालबाग-परळ भागात कापड गिरण्या बांधण्यात आल्या. यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झाला.
यामुळे ज्या लोकांना गिरण्यांमध्ये काम मिळाले ते कामगार लालबाग परळमध्ये राहू लागले. त्यानंतर मुंबईचा झपाट्याने विकास होत असताना कापड गिरण्यांचा विकास पाहता कारखान्यांसाठी जागा कमी पडू लागली.
त्याकाळी इंग्रजांनी लालबाग परळमधील पेरू चाळ हटवून तिथे कारखाना बांधण्याची योजना आखली. त्यामुळे तिथल्या मासेविक्री करणाऱ्या लोकांच्या व्यवसायावर गदा आली.
व्यवसाय धोक्यात येत असल्यामुळे मासेविक्रेत्यांनी एकत्र येऊन गणरायाला 'आमच्या व्यवसायाला हक्काची जागा मिळू दे' असा नवस केला. त्यानंतर वर्षभरात या मासेविक्रेत्यांना मार्केट मिळाले.
सन १९३४ मध्ये लालबागच्या या मार्केटमध्ये सर्व मासेविक्रेत्यांनी गणपतीची मूर्ती आणून तिची गणेशोत्सवात स्थापना केली. या मूर्तीची पहिल्या वर्षातच नवसाला पावणारा गणपती अशी ओळख झाली. तसेच तो लालबाग परळच्या मार्केटमध्ये बसवण्यात आल्याने त्याला लालबागचा गणपती लोक म्हणून लागले.
लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा त्यांचा राजा म्हणजेच त्याची ओळख 'लालबागचा राजा' अशी कायमची झाली. हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता असल्याने आजही लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात.