मुंबई : मुलं जसजशी मोठी होतात तसतशी आईवडिलांची जबाबदारी वाढते. किशोरवयात प्रवेश केल्यानंतर मुलं स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागतात. तसेच या काळात त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असल्याने मुले चिडचिडी बनतात. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये मतभेद होतात. मुले पालकांचे म्हणणे ऐकायला तयार नसतात. अशावेळी किशोरवयीन मुलांशी पालकांनी सावधपणे वागले पाहिजे.
मुलं ऐकत नसतील तर त्यांना ओरडू नका. तसे केल्यास मुले हट्टी बनतात. मुलांना समजावण्यासाठी आधी स्वत: शांत राहाणे आवश्यक आहे.
मुलांसाठी काही नियम तयार करा व ते स्वत:ही पाळा. मुलांनी नियम मोडल्यास त्यांना शिक्षा नक्की करा पण त्यातून त्यांच्यात न्यूनगंड किंवा राग निर्माण होणार नाही ना याची काळजी घ्या. शिक्षेतून मुलांना समज मिळणे आवश्यक आहे.
मुलांशी मैत्री करा. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी मैत्री करत नाही तोपर्यंत मुले तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक गोष्टी सांगणार नाहीत.
प्रत्येकवेळी आपलं म्हणणं मुलांवर लादू नका. त्यांचं म्हणणं समजून घ्या. त्यांच्या जागी जाऊन त्यांच्या बाजूने विचार करा.