सकाळ डिजिटल टीम
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली 'हिरामंडी: द डायमंड बाजार' ही वेबसिरीज गाजतेय. तवायफांच्या आयुष्यावर असलेल्या वेबसीरिजने सगळ्यांचंच मन जिंकलंय.
पण या आधीही बॉलिवूडमध्ये तवायफांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमे बनले आहेत. जाणून घेऊया बॉलिवूडमधील अशाच काही गाजलेल्या सिनेमांविषयी.
1972 साली रिलीज झालेला कमाल अमरोही दिग्दर्शित 'पाकिजा' या सिनेमाचं नाव अग्रस्थानी घ्यायला हवं. राजकुमार आणि मीना कुमारी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या.
मीना कुमारी या सिनेमातील साहिब जान ही भूमिका अक्षरशः जगल्या. या सिनेमात त्यांनी सादर केलेले मुजरे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी आणि त्याच्यावर मीना कुमारी यांची लाजवाब अदाकारी आजही मंत्रमुग्ध करते.
खय्याम यांचं संगीत, शहरयार यांची गीतं, आशा भोसलेंनी या गाण्यांना दिलेला सुमधुर आवाज आणि रेखा यांची दिलखेचक अदाकारी यांनी नटलेला उमराव जान हा सुद्धा तवायफांच्या आयुष्यावर आधारित महत्त्वाचा सिनेमा. 1981 साली रिलीज झालेल्या या सिनेमाची क्रेझ आजही टिकून आहे.
'इन आँखो की मस्ती में','दिल चीज क्या है' ही रेखा यांच्यावर चित्रित झालेली गाणी आणि रेखा अदाकारी याचे लाखो प्रेक्षक फॅन झाले होते. उमराव जान या तवायफचा कवयित्री होण्याचा प्रवास आणि प्रेमासाठी तिने केलेला संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला होता.
1958 साली रिलीज झालेला सुनील दत्त आणि वैजयंतीमाला यांची मुख्य भूमिका असलेला 'साधना' हा असाच एक सिनेमा. तवायफ असलेली चंपाबाई समाजात मान मिळवण्यासाठी रजनी नाव धारण करून एका तरुणाशी लग्न करते आणि पुढे तिचं सत्य उघड झाल्यावर काय घडतं याची कथा या सिनेमात दाखवण्यात आली होती.
वैजयंतीमाला यांची अदाकारी, संसार टिकवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आणि त्यांनी धाडसी पाऊल उचलल्यामुळे झालेला विरोध यामुळे हा सिनेमा गाजला होता. साहिर लुधियानवी यांनी या सिनेमाची गीतं लिहिली होती तर दत्ता नाईक या सिनेमाचे संगीतकार होते.
1970 मध्ये रिलीज झालेला हेमामालिनी, अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेला शराफत हा ही एक चर्चेत राहिलेला सिनेमा. असित सेन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
एक प्रोफेसर एका तवायफचं आयुष्य सुधारवण्याचा प्रयत्न करतो पण समाजाच्या दबावामुळे ती पुन्हा तिच्या जुन्या आयुष्याकडे परतते अशी या सिनेमाची कथा होती. या सिनेमातील हेमामालिनी अखेरच्या 'शराफत छोड दि मैंने' या गाण्यावरील मुजरा गाजला होता.
संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' सिनेमात माधुरीने साकारलेली चंद्रमुखी कोण कसं विसरू शकतं. तिच्या अदाकारीने आणि अभिनयाने माधुरीने ही व्यक्तिरेखा अजरामर केली.
देवदासवर जीव तोडून प्रेम करणारी आणि मोठं मन असलेली चंद्रमुखी ही तवायफची व्यक्तिरेखा सगळ्यांना भावली. या सिनेमात तिने 'मार डाला' या गाण्यावर केलेला मुजरा अजरामर आहे.
जाणून घ्या अभिनेत्री मनीषा कोईरालाच्या प्रवासाबद्दल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.