झाडे, भाज्याही वेदनेने 'किंचाळतात'; नवीन संशोधनात समोर आली बाब!

अंकिता खाणे (Ankita Khane)

वनस्पतींमध्ये जीवन असतं याचा शोध जगदीशचंद्र बोस यांनी लावला होता. मात्र, वृक्षांमधून आवाज येत नसल्यामुळे त्यांना तोडताना वेदना जाणवतात की नाही, याबाबत आतापर्यंत लोक अनभिज्ञ होते.

ज्याप्रमाणे प्राण्यांना मारताना ते किंचाळतात, त्याचप्रमाणे भाज्या आणि इतर वनस्पती देखील तोडल्या जात असताना मोठ्याने किंचाळतात; असं एका संशोधनात स्पष्ट झालं आहे.

इस्राइलच्या तेल अवीव युनिवर्सिटीमध्ये हे संशोधन करण्यात आलं. सेल (Cell) या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.

वनस्पतींमधून येणारा आवाज हा एवढा कमी असतो, की मानवी कानांना तो ऐकू येत नाही. याच आवाजाच्या मदतीने वनस्पती एकमेकांशी संवाद देखील साधतात असंही या संशोधनात म्हटलं आहे.

"एखाद्या शांत वाटणाऱ्या गवताच्या कुरणात देखील आपल्याला ऐकू न येणारे कित्येक आवाज असतात. गवतातून येणारे हे आवाज काही प्राण्यांना ऐकू येतात.

म्हणजेच आपल्याला माहिती नसलेल्या फ्रीक्वेन्सीमध्ये कित्येक झाडं एकमेकांशी संवाद साधतात, तसंच प्राण्यांनाही याची जाणीव असते." अशी माहिती इव्हॉल्यूशनरी बायोलॉजिस्ट Lilach Hadany यांनी सायन्स डिरेक्ट वेबसाईटशी बोलताना दिली.

वनस्पती-प्राणी साधतात संवाद

त्या पुढे म्हणाल्या, "वनस्पती आणि कीटक विविध माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत असतात हे यापूर्वीच सिध्द झालं आहे.

आता वनस्पती आवाजाचा वापर करत असल्याचं देखील स्पष्ट झाल्यामुळे, वनस्पती आणि कीटक एकमेकांशी आवाजाच्या माध्यमातून देखील संवाद साधत असतील असं म्हणायला वाव आहे."

झाडांना जाणवतो तणाव

ज्याप्रमाणे आपल्याला किंवा अन्य प्राण्यांना तणाव जाणवतो, त्याप्रमाणे झाडांनाही तणाव जाणवतो. तणावात असताना त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतात.

कित्येक झाडं तणावात असताना अतिशय उग्र दर्प सोडतात, तर काही त्यांचा रंग आणि आकारही थोड्याफार प्रमाणात बदलू शकतात.

झाडेही आपल्याप्रमाणेच किंचाळतात

तणावात असल्यानंतर झाडांच्या इतर प्रतिक्रिया संशोधकांना माहिती होत्या. मात्र, अशा वेळी झाडं मोठ्याने किंचाळतात का याचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.

यासाठी काही टोमॅटो आणि काही तंबाखूच्या झाडांना तणावपूर्ण स्थितीत ठेवण्यात आलं. तणावपूर्ण स्थिती म्हणजे, काही झाडांना मुळापासून खुडण्यात आलं, काहींना मधून तोडण्यात आलं, तर काहींना पाण्यापासून दूर ठेवण्यात आलं.

अशा तणावपूर्ण स्थितीमध्ये या झाडांमधून अतिउच्च फ्रीक्वेन्सीच्या साउंड वेव्ह्ज निघाल्याचं या संशोधनात स्पष्ट झालं.

या फ्रीक्वेन्सी एवढ्या उच्च होत्या की माणसांना हे ऐकणं दूर, तर एक मीटरच्या अंतरात या डिटेक्ट होणंही अवघड होतं असं संशोधकांनी सांगितलं.

ज्या झाडांना आजिबात तणावाखाली ठेवलं नव्हतं, त्या झाडांमधून मात्र अशा कोणत्याही साउंड वेव्ह्ज आल्या नसल्याचं संशोधकांनी सांगितलं.

झाडं हा आवाज कसा तयार करतात हे अद्याप आपल्याला माहिती नसल्याचं संशोधकांनी रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea