

गॅस टंचाईवरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक
कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः तालुक्यात गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. सोमवारी (ता. ६) संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
राज्यभर ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन सुरू असून कर्जत तालुक्यातही या आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला. गॅस टंचाईचा परिणाम केवळ घरांपुरता मर्यादित नसून हॉटेल, केटरिंग, रिक्षा व्यवसाय तसेच विद्यार्थ्यांच्या मेस सेवांवरही झाला आहे. अनेक ठिकाणी जेवणाची गैरसोय होत असल्याने ते गावाकडे परत जात आहेत. काही भागात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असून अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, अकोला व अमरावती येथे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाल्याच्या घटनांचा उल्लेख करून सरकारवर टीका करण्यात आली. संघटनेने कृत्रिम टंचाई थांबवणे, काळाबाजार रोखणे, वितरण सुलभ करणे तसेच गरजूंकरिता कम्युनिटी किचन सुरू करण्याच्या मागण्या केल्या आहेत. या निवेदनावेळी धर्मेंद्र मोरे, प्रदीप ढोले, लोकेश यादव यांसह पदाधिकारी उपस्थित होते.