

Importance of Guru
esakal
डाॅ. पंडित विद्यासागर
भारतात गुरुपरंपरा सर्वच क्षेत्रांत पाहायला मिळते, हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्यच आहे. पाश्चिमात्य जगातही अनेक थोर व्यक्तींनी गुरुपरंपरेचे महत्त्व मान्य केले आहे. मात्र अलीकडे यात अनेक अनिष्ट प्रथा फोफावताना दिसतात. त्यामुळे ‘गुरू’ असे म्हटले, की मनात शंका उपस्थित होतात. ही परंपरा निकोप पद्धतीने जोपासली जावी, यासाठी सर्वांनीच सजग राहिले पाहिजे.
भारतीय परंपरेत ‘गुरू’ ही संज्ञा व्यापक अर्थाने प्रचलित आहे. वर्गात शिकवतो तो शिक्षक आणि जीवनाचे शिक्षण देतो तो गुरू, अशी व्याख्या करता येईल. दोघेही आपल्याला ज्ञानसंपन्न करतात. शिक्षक विषयाचे ज्ञान देतो, त्यामुळेही जीवनाचा मार्ग सापडतो. गुरू हा रूढार्थाने तुमचा शिक्षक असेलच असे नाही, परंतु तो तुमचे जीवन संपन्न करू शकतो. गुरूचे सान्निध्य परिसाप्रमाणे काम करते. हे सान्निध्य जीवन उजळून टाकते. सुदैवाने मला शिक्षक आणि गुरू दोन्हीही लाभले, त्यामुळेच मी विज्ञान विषयात प्राविण्य मिळवू शकलो.