भंडारा जिल्ह्यातील नंदा, कान्हा गवळी मंदिर आणि त्याची परंपरा

nanda
nanda

कुंभली (जि. भंडारा) : प्रत्येक परीसराची आपली कहाणी असते. संस्कृती असते, काही वास्तू असतात, त्यांच्या कथाही असतात. तिथल्या परंपराही असतात आणि त्या सांभाळण्याचा, जपण्याचा तिथले स्थानिक लोक आपल्या परीने प्रयत्न करीत असतात.

भंडारा जिल्ह्यालाही अशीच परंपरा लाभली आहे. शिवणीबांध या जलाशयाच्या काठावर वडाच्या झाडाखाली नंदा गवळी आणि कान्हा गवळी यांचे शेकडो वर्षे जुने मंदिर आहे. हे ठिकाण परिसरातील नागारिकांचे श्रद्धास्थान आहे.

भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. साकोलीवरून 10 किलोमीटरवर शिवणीबांध तलाव आहे. शिवणीबांध तलावाची आणखी एक विशेष ओळख मासोळीसाठी सुद्धा होत असते. शिवणीबांध जलाशय पर्यटकांना भुरळ घालते. येथील निसर्ग सौंदर्य पाहणाऱ्यांना मोहून टाकत असते. जलतरणपटू नेहमी जलाशयात पोहण्यासाठी येत असतात.

नंदा गवळी व कान्हा गवळी या मंदिरा विषयी काही दंतकथा परिसरातील नागरिकांकडून सांगितल्या जातात. शेकडो वर्षापूर्वी येथे गवळी बांधवांची वस्ती होती. याच तलावाच्या परिसरात त्यांची लहान लहान घरे होती. पशुपालन आणि दूध उत्पादन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. त्यामुळे त्यांच्याकडे गोधन मोठ्या प्रमाणात होते. अचानक एक दिवस जोरदार अतिवृष्टी झाली. यात संपूर्ण वस्ती उद्‌ध्वस्त झाली. वस्तीमधील एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही. परंतु, त्या दिवशी नंदा गवळी आणि कान्हा गवळी हे दोघे भाऊ बाजाराला गेले असल्याने त्यांचे प्राण वाचले.
वस्तीमध्ये परत आल्यावर त्यांनी पाहिले की पूर्ण वस्ती नष्ट झाली आहे. कुटुंब, मित्र, नातेवाईक सारे मृत झाले. आता आपण जीवन जगून काय करणार? असे म्हणून त्यांनीसुद्धा मृत्यूला जवळ केले.

कालांतराने सानगडीजवळील कटांगधरा या गावातील एका पाटलीन बाईच्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितले की, शिवणीबांध तलाव या ठिकाणी आपली समाधी तयार करा. यामुळे शेकडो वर्षापासून नंदा गवळी आणि कान्हा गवळी यांची लहान लहान दोन मंदिरे बांधण्यात आली. आजही ती मंदिरे त्याच स्थितीत आहेत.

लग्नकार्य, नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी
शिवणीबांध परिसरातील आजूबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी लग्नप्रसंगी व नवीन अपत्य झाल्यास तसेच नवस केल्यास पूजा करण्यासाठी येतात.

जीर्णोद्धाराची प्रतीक्षा
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे. मंदिर जुने असल्याने भिंतींना तडे गेले आहे. ऊन,वारा पावसात हे मंदिर कसेतरी तग धरून उभे आहे. भाविकांना उन व पावसापासून बचावासाठी शेड नाही. मात्र अजून कोणीही जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतलेला नाही.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com