काश्‍मिरी पंडितांसाठी ‘मॉडेल सिटी’चा प्रस्ताव!

‘ग्लोबल काश्‍मिरी पंडित डायस्पोरा’ संघटनेचा पुढाकार
काश्‍मिरी पंडितांसाठी ‘मॉडेल सिटी’चा प्रस्ताव!
काश्‍मिरी पंडितांसाठी ‘मॉडेल सिटी’चा प्रस्ताव!Sakal

नवी दिल्ली : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे काश्‍मिरी पंडितांच्या समस्यांना आवाज मिळाल्यानंतर आता या समाजाने त्यांच्या पुनर्वसनासाठी काश्मीर खोऱ्यात ‘मॉडेल सिटी’चे नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी शहराचा आराखडा तयार केला आहे. तो केंद्राकडे पाठविला जाणार आहे. याबरोबरच काश्‍मिरी पंडितांच्या हत्यांना जबाबदार असलेल्या बिट्टा कराटे आणि यासीन मलिक यांना फाशी देण्याची मागणी देखील त्यांच्याकडून होऊ लागली आहे.

‘ग्लोबल काश्‍मिरी पंडित डायस्पोरा’ ही संघटना गेली अनेक वर्षांपासून जगभरातील काश्‍मिरी पंडितांना जोडण्यासाठी कार्यरत आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. संघटनेचे संस्थापक डॉ. सुरेंद्र कौल, उत्पल कौल, डी. के. बक्षी, परिक्षित कौल आदी यावेळी उपस्थित होते. ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने आमच्या वेदना व्यक्त होण्यासाठी वाट मोकळी करून दिली आहे. आता तरी आमच्या समस्यांची सरकार दरबारी दखल घेतली जाईल, असा विश्‍वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

डॉ. कौल म्हणाले, ‘‘काश्‍मिरातील हिंसाचार हा एका दिवसांत सुरू झाला नाही. तेथील पंडितांचे पलायन होण्याआधी हा हिंसाचार सुरू झाला होता. त्यावेळी आम्हाला लक्ष्य केले जात होते. आमचे रक्षण करण्यासाठी आम्ही एक खडा देखील कुणाला मारला नाही. स्थलांतर करून आम्ही मानवतेची सेवा करीत राहिलो. त्यामुळे शांततेचा नोबेल पुरस्कार किंवा भारतरत्न द्यायचा असेल, तर काश्‍मिरी पंडित समाजाला द्यावा. हा चित्रपट अजिबात प्रचारकी नाही. त्यात संपूर्ण सत्य आहे.’’

काश्‍मिरी पंडितांसाठी शहर वसविण्याबाबत डॉ. कौल यांनी सांगितले, की जगभरात दहा लाखांहून अधिक काश्‍मिरी पंडित आहेत. त्या प्रत्येकाला पुन्हा त्यांच्या जन्मस्थळी जायचे आहे. आजच्या बाजारभावाने आमच्या तेथील मालमत्तेची किंमत ३५ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. म्हणून आमच्यासाठी ‘मॉडेल सिटी’ तिथे असली पाहिजे. त्यासाठी दोन वर्षे कष्ट करून नगरनियोजन तज्ज्ञांच्या मदतीने शहराचा आणि पंडितांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार केला.

राहुल, सोनियांनी चित्रपट पाहावा

उत्पल कौल यांनी आम्हाला न्याय हवा, असे सांगताना, काश्‍मिरी पंडितांच्या हत्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला शिक्षा झाली नाही. म्हणूनच यासीन मलिक आणि बिट्टा कराटे यांना फाशी द्यावी, अशी मागणी केल्याचे कौल म्हणाले. कॉँग्रेस नेते या चित्रपटाबद्दल वेगळी भूमिका मांडत आहेत. परंतु पंडित नेहरू हेही काश्‍मिरी पंडित होते. त्यामुळे सोनिया आणि राहुल यांनी हा चित्रपट पाहावा आणि आमच्या वेदनेवर बोलावे. बॉलिवूडमधील महान अभिनेत्यांनी हा चित्रपट पाहून पंडितांच्या वेदनेबाबत तोंड उघडावे, अशी अपेक्षा कौल यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com