शिवसेना-भाजपमध्ये सध्या थाळीवाद पेटलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेवर आलो तर जनतेला 10 रुपयांत जेवणाची थाळी देऊ अशी घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली.
शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी पाहणाऱ्या भाजपनं तर चक्क 5 रूपयांत जेवणाची थाळी देण्याची घोषणा केलीय. महाराष्ट्र अटल आहार योजना नावानं ही योजना सुरू असून तिची व्याप्ती वाढवणार असल्याचं भाजपनं म्हटलंय. या थाळीवादाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतलाय.
तुम्हाला राज्य चालवायचं की स्वयंपाक करायचाय, असा खोचक सवालच शरद पवारांनी केलाय. युती सरकारनं सुरू केलेल्या झुणका भाकर योजनेच्या जागांचं काय झालं, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनीही या थाळीच्या राजकारणावर सडकून टीका केलीय.
आजच्या महागाईच्या जमान्यात अवघ्या पाच रुपयांत किंवा 10 रुपयांतही सकस जेवण देणं कसं शक्य होईल, असा सवाल केला जातोय. अंत्योदय योजनेत 2 रु. किलो दरानं गहू तर 3 रु. किलो दरानं तांदूळ मिळतात. त्यापासून अन्न तयार करण्यासाठी तेल, मीठ, मसाले, इंधन, मजुरी, जागा यासाठी खर्च येणार. हा खर्च 10 रुपयांत बसणार का? नाही बसल्यास तो सबसिडीच्या रूपानं सामान्यांच्या खिशातून वसूल करणार का? असा सवाल आता विचारला जातोय.
गरिबी हटवण्यासाठी गरिबांना शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं गरजेचं आहे. नाहीतर अशा घोषणा केवळ लोकप्रिय ठरतात आणि नंतर बंद पडतात, हे महाराष्ट्रानं या आधीही पाहिलंय.
WebTitle : marathi news maharashtra vidhansabha 2019 bjp shivsena thali diplomacy
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.