तिळगूळ घ्या, फक्त फेसबुक-व्हॉट्‌सऍपवरच! 

makar sankrat
makar sankrat

औरंगाबाद - "आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा', "एक तीळ रुसला, फुगला; रडत गुळाच्या पाकात पडला, खटकन हसला, हातावर येताच बोलू लागला, तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' अशा हजारो गुळचट शुभेच्छांनी मंगळवारी (ता. 15) प्रत्येकाच्या मोबाईलचा चॅटबॉक्‍स भरून पावला आहे.केवळ शब्दांच्या स्वादिष्ट शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे दिल्या जात असताना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची परंपरा संपुष्टात आल्याचा फील या मकर संक्रांतीला अनेकांना आला. 

नवीन वर्षाची सुरवात गोडीगुलाबीने व्हावी, यासाठी मकर संक्रांतीचे औचित्य साधले जात असावे. जुनी भांडणे, मतभेद, गैरसमज बाजूला सारून नव्या वर्षात "तिळगूळ घ्या अन्‌ गोड गोड बोला' असा संदेश संक्रांतीला दिला जातो. या निमित्ताने परस्परांच्या घरातील वेगवेगळ्या चवीचा तिळगूळही खायला मिळतो. 

मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मोबाईलवरच सुंदर दिसणाऱ्या तिळगुळाच्या आकर्षक छायाचित्रांची कोरडीच चव चाखावी लागत आहे. सणावाराला सकाळपासूनच प्रत्येकाच्या मोबाईलमधील फेसबुक, व्हॉट्‌सऍपचा चॅटबॉक्‍स अशा शुभेच्छांनी भरून जातो आहे. व्हॉट्‌सऍपवर मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक इमोजी, स्टिकर्स आणि इमेजेस तयार करून परस्परांना पाठविल्या. त्यामुळे प्रत्यक्षात भेटून तिळगूळ देण्याची परंपरा संपत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळाले. 
 
 तरुण-तरुणीच काय म्हणतात पहा... 

शाळेत असताना सर्व मित्र-मैत्रिणी घरचा तिळगूळ आणत असत. आता मात्र शाळेतले जुने मित्रदेखील व्हॉट्‌सऍपवर फोटो पाठवून गोडगोड बोलण्याचा आग्रह करीत आहेत. 
- गायत्री तरतरे 
 
महागाई वाढल्याने प्रत्येकाला तिळगूळ देणं शक्‍य नाही. यामुळे मोबाईलवरून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या सर्वत्र बघायला मिळाल्या; परंतु आम्ही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यास प्राधान्य दिले. 
- कोमल दांडगे 
 

पूर्वी एक-दुसऱ्यांमधील भांडणे सोडविण्यासाठी मकर संक्रांत महत्त्वाची होती. या दिवशी तिळगूळ देऊन गोड गोड बोला म्हटलं, तर सहज भांडणे मिटत होती. आता तसे होईल का, शंकाच आहे! 
- अपूर्वा तळणीकर 
 
काळ बदलत चालला आहे. त्यानुसार सण साजरा करण्याची पद्धतही बदलली आहे. तिळगुळाची जागा ऑनलाइन स्टिकर्स, पतंग, ग्रिटिंग्जने घेतलेली दिसते. सोशल मीडियामुळे माणूस आपल्या माणसांपासून दूर गेलाय. 
- प्रतीक कुकडे 
 
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपण सणवार, परंपरा, उत्सव हे शुभेच्छांच्या मॅसेजेसवरच साजरे करणार का? असं करणं म्हणजे आपल्या सणवारांची कुचेष्टाच म्हणावी लागेल. 
- विष्णू सुरवसे 
 
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे संस्कृती लयाला जायला अजिबात वेळ लागणार नाही. आता नात्यांतला स्नेह संपत चालला असून, तो दूर करायचा झाल्यास आभासी जगातून बाहेर पडावे लागेल. 
- ऐश्‍वर्या कुलकर्णी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com