प्रदेश काँग्रेसची २८० जणांची जंम्बो कार्यकारीणी

प्रदेश काँग्रेसची २८० जणांची जंम्बो कार्यकारीणी

Published on

प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी
४० टक्के जुने चेहरे; पक्षात नाराजी उफाळणार?

विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः स्थानिक स्वराज्य संस्था व पालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेस पक्ष २८० जणांची जम्बो कार्यकारिणी नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी डावलून ही जम्बो कार्यकारिणी निवडली गेली आहे. या नियुक्तीवरून पक्षात नाराजी उफाळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आता काँग्रेस आपल्या प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार करणार आहे. या कार्यकारिणीत सरचिटणिसांची संख्या ११० ते ११५ पर्यंत, तर सचिवपदे १०५ ते १०८ पर्यंत आणि पाच वरिष्ठ प्रवक्ते व एक माध्यम समन्वयकाचा समावेश असणार आहे. वरिष्ठ उपाध्यक्षाची संख्या १५ ते २०, तर ३५ ते ४० उपाध्यक्ष या टीममध्ये असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे.
या वेळची कार्यकारिणी जवळपास २८० पदाधिकाऱ्यांची असणार आहे. यामध्ये ६० टक्के नवे चेहरे, तर ४० टक्के जुने चेहरे आहेत. यामुळे पक्ष नवे नेतृत्व विकसित कसे करणार, असा सवाल एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. बाहेरून आलेल्या काही नेत्यांचाही समावेश या जम्बो कार्यकारिणीत करण्यात आला आहे. यापूर्वी काँग्रेसने विभागवार नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र प्रत्यक्षात त्याचा विशेष फायदा झाला नसल्याचे चित्र होते.
पक्षातील प्रभावी व जनाधार असलेल्या चेहऱ्यांना या टीममध्ये स्थान देणे आवश्यक होते; मात्र तसे होताना दिसत नसल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या एका नेत्याने दिली. महत्त्वाचे म्हणजे या सर्व नियुक्त्या करताना, जिल्हाध्यक्षांचे मत विचारात घेतले नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी नेत्यांच्या मागे राहणाऱ्या, दिल्ली कनेक्शन असणाऱ्यांना तसेच जनाधार नसलेल्या नेत्यांना कार्यकारिणीत स्थान मिळाल्याची टीका एका काँग्रेस नेत्याने केली आहे.
...
प्रदेशाध्यक्षांची मागणी डावलली
हर्षवर्धन सपकाळ यांनी नव्या टीमची संख्या ६० ते ७०पर्यंत मर्यादित ठेवण्याची मागणी केली होती; मात्र प्रत्यक्षात इतर नेत्यांच्या आग्रहामुळे २५०पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांची यादी दिल्लीला पाठवावी लागल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या समर्थकांना स्थान देण्याच्या माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय नेत्याच्या आग्रहामुळे ही यादी मारुतीच्या शेपटासारखी लांबल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
...
आक्षेप कोणते?
- बहुतांश नागपूर, ठाणे, पुण्याच्या नेत्यांचा भरणा
- जनाधार असलेल्यांना डावलले
- जिल्हाध्यक्षांचे मत विचारात घेतले नाही
- ४० टक्के जुन्याच चेहऱ्यांना संधी
- नव नेतृत्व विकसित कसे होणार?
- विदर्भातून ४० टक्के प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com