

सोमाटणे, ता. २९ : दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाखालील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.
द्रुतगती मार्गालगतच्या गहुंजे, शिरगाव, सोमाटणे, उर्से, परंदवडी, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, बेडसे, ताजे, देवले, औंढे, कुसगाव आदी गावांच्या हद्दीत शेताकडे जाणारे अनेक रस्ते हे द्रुतगती मार्गाखालील मोऱ्यांमधून जातात. मात्र, सध्या या मोऱ्यांखालील रस्त्यांवर पावसामुळे माती, गाळ व कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे कठीण झाले आहे. येत्या पावसाळ्यात या नाल्यांमध्ये आणखी गाळ साचण्याची शक्यता असून, त्यामुळे रस्ते पूर्णपणे बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावसाळ्यापूर्वीच या नाल्यांची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी जमीन हक्क परिषद, मावळचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांनी केली आहे.
---