

Baiju Parthan’s Creative Journey
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
बैजू पार्थन यांना आदर होता तो शास्त्रज्ञ आणि संशोधक यांच्याबद्दल. ते कलाकार होतील असे कुणाला वाटले नव्हते. केरळच्या पार्थन यांनी कलेचे धडे गिरवले ते गोव्यात. त्यानंतर ते मुंबईत आले. तिथे त्यांचा साहित्यिक-कलावंतांशी संपर्क आला. विज्ञानवादी असलेल्या पार्थन यांनी ‘‘एआय’ शी देखील जुळवून घेतले. मात्र नंतर त्यांना निसर्गाचीच ओढ लागली. जीवनाची शोधयात्रा त्यांना महत्त्वाची वाटते.
ह्या विश्वासंबंधी प्रश्न उभे करणे हेच बैजू पार्थन यांच्यासाठी कलेचे मर्म आहे. काही कलाकार हे रंगकामाने सुरुवात करतात तर काही आठवणीत रमतात. बैजू यांची सुरुवात होते तीच मुळी प्रश्न विचारून. त्यांची जडणघडण १९६०-७० या दोन दशकांत केरळात कोट्टायम इथे झाली. त्यांचे आई-वडील दोघेही कामाला जात असत. बराच वेळ हा मुलगा एकटा असे. आजी आजोबा घरात असत पण ते गोष्टी सांगत नसत. ते काही मोठे संयुक्त कुटुंब नव्हते आणि अन्य व्यत्यय आणणारे काही नव्हते. त्यामुळे पुस्तके हीच त्यांना साथ देत राहिली. ‘माझ्या आईने कसंबसं मला वाचायला लावलं. सारं काही कसं चालतं याबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं. बरेच दिवस मी फक्त कोशांचंंच वाचन करत होतो.’
त्यांना गंमत वाटते, की ते अभ्यासू पण आत्ममग्न असायचे. परंतु इतर कोणाच्याही बाबतीत दिसत नसले तरी हा स्वभावच त्यांच्या कलाजीवनाचा आधार बनला.