Rahul Gandhi : अंबानी-अदानींचे हित मोदींनी जपले ; रायबरेलीतील सभेमध्ये राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

‘‘ माझ्या कुटुंबाने रायबरेली मतदारसंघाची सेवा केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी- अंबानी यांचे हित जपण्याचे काम केले. येथील लोकांशी माझ्या कुटुंबाचे जुने ऋणानुबंध असल्यानेच मी येथून निवडणूक लढवीत आहे,’
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal

रायबरेली (उत्तर प्रदेश) : ‘‘ माझ्या कुटुंबाने रायबरेली मतदारसंघाची सेवा केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी- अंबानी यांचे हित जपण्याचे काम केले. येथील लोकांशी माझ्या कुटुंबाचे जुने ऋणानुबंध असल्यानेच मी येथून निवडणूक लढवीत आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सभेमध्ये बोलताना केले.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल यांनी आज प्रथमच सभा घेत रायबरेलीकरांशी संवाद साधला. राहुल गांधी म्हणाले, ‘‘ या केंद्र सरकारने निवडक २२ ते २५ उद्योजकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले असून या पैशातून ‘मनरेगा’ला २४ वर्षे अर्थपुरवठा करता आला असता. माझी आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी रायबरेलीतील जनतेचे जीवन सुधारावे म्हणून काम केले. सध्या माध्यमे ही शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे प्रश्न मांडताना दिसत नाहीत त्याऐवजी उद्योजकांचे विवाहसोहळे दाखविले जात आहेत. केंद्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर गरीब कुटुंबाच्या खात्यावर आम्ही दरमहा ८ हजार ५०० रुपये जमा करू. अशा पद्धतीने त्यांना वर्षाकाठी १ लाख रुपये दिले जातील. छोट्या शेतकऱ्यांचे कर्ज आम्ही माफ करू त्याचप्रमाणे किमान हमी भावाला देखील कायदेशीर दर्जा देऊ.’’

आता लवकरच लग्न करू

सभा आटोपल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा लग्नाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. आपण कधी विवाहबद्ध होणार आहात, असा प्रश्न उपस्थितांनी करताच राहुल यांनी त्यावर ‘लवकरच विवाह करू’ असे उत्तर दिले. राहुल यांनी प्रियांका गांधी यांचे भाषणात कौतुक केले. ‘‘मी देशभर प्रचारात व्यग्र असताना माझी बहीण रायबरेलीसाठी वेळ देत आहे, त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानतो,’’ असे ते म्हणाले. याच वेळी उपस्थितांमधील एकाने लग्न कधी करणार, असा सवाल करताच, ‘आता लवकरच करावे लागेल’ असे उत्तर त्यांनी दिले.

महालक्ष्मी क्रांतिकारी योजना ; सोनिया गांधी

मागील काही निवडणुकांमध्ये रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ‘‘स्वातंत्र्याच्या लढाईत महिलांचे भरीव योगदान असले तरी सध्या त्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या श्रम व तपश्चर्येला न्याय देण्यासाठी काँग्रेसतर्फे महालक्ष्मी ही क्रांतिकारी योजना आखण्यात आली आहे. यासाठी महिलांनी काँग्रेसला मतदान करावे,’’ असे आवाहन सोनिया यांनी केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख असलेल्या महालक्ष्मी योजनेत गरीब कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देण्याची हमी दिली आहे. काँग्रेसची ही गॅरंटी कर्नाटक व तेलंगणातील जनतेला लागू झाली आहे. महिलांच्या विकासासाठी महालक्ष्मी योजना ही सर्वाधिक प्रभावशाली योजना असल्याचे सोनियांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com