संभाजी पवार  : भाजपोदयाचा अग्रदूत

Sambhaji Pawar: The forerunner of BJP
Sambhaji Pawar: The forerunner of BJP

संभाजी पवार यांनी 2003 साली जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश करणे अनेकांसाठी धक्‍कादायक होते. डावा ते उजवा असा तो प्रवास होता. तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आग्रहपूर्वक पक्षप्रवेशासाठी त्यांनी आणलं. त्यांचा तो हट्ट गोपीनाथ मुंडे यांनी तो पूर्ण देखील केला. तिथून जिल्ह्यातच नव्हे पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप उदय सुरु झाला. पश्‍चिम महाराष्ट्र भाजपसाठी नेहमीच ओसाड भूमी होती. तिथे पवारांनी भाजपच्या पायाभरणी सुरु केली मात्र पुढे या यशाची फळे त्यांना चाखता आली नाहीत. ते कायम बॉर्न विरोधकच राहिले. 

एक-दोन नगरसेवकांपलीकडे सांगली जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व नव्हते त्या काळात संभाजी पवार यांनी जिल्ह्यात भाजपला बळ दिले. त्यानंतरच भाजप राजकीय चर्चेत आला. चार आमदार, खासदार, जिल्हा परिषद, महापालिका या सर्व पातळ्यांवर भाजपने आता झेंडा फडकवला. हा प्रवासाचा पाया पवार यांनी घातला. या पक्षाला सामान्य कष्टकरी जनतेशी-बहुजनांशी त्यांनी जोडले. युतीच्या काळात अण्णा डांगे यांच्याकडे मंत्रिपद होते पण पुढे डांगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर मुंडे यांना सांगलीसाठी एक दमदार बहुजन चेहरा हवा होता. तो संभाजी पवारांच्या रुपाने त्यांना मिळाला. आणि मुंडे-पवार हे नाते पुढे घट्ट होत गेले. 

संभाजी पवार यांनी आपली राजकीय दुसरी विनिंग भाजपमधून अशी धडाकेबाजपणे सुरू केली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यानंतरच्या निवडणुकीते ते हरले पण 2008 मध्ये झालेल्या सांगली महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी येथील मदन पाटील यांची 25 वर्षांची अबाधित सत्ता महाआघाडीचा प्रयोग करून उलथून टाकली. यावेळीच जयंत पाटील यांच्या नेतृत्वालाही त्यांनी सांगली शहराच्या राजकारणात वाट करून दिली. कारण मदन पाटील राष्ट्रवादीतून गेल्यानंतर सांगली-मिरज शहरात राष्ट्रवादी शून्य झाली होती. ती पुन्हा सत्तेत आणण्यात सर्वपक्षीय महाआघाडीचा प्रयोग झाला. या सर्व आघाड्या जोडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर 2009 च्या विधानसभेत निवडणुकीतही संभाजी पवार यांनी आपल्या जुन्या पराभवाचे उट्टे काढत मदन पाटील यांना धोबीपछाड देत विधानसभेत प्रवेश केला. नुसती सांगलीच नाही तर त्यावेळी मिरज आणि जतसह तीन मतदारसंघातून भाजपला घवघवीत यश मिळाले होते आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनाही मोठा धक्‍का दिला होता. सांगली जिल्हा भविष्यात भाजपमय झाला त्याची ही नांदी होती. आप्पांनी सांगलीत जनता पक्ष, जनता दल हे पक्ष रुजवलेच पण भाजपचे कमळ येथे फुलवण्याचे खरे श्रेयदेखील त्यांचेच. 

अचूक निर्णयक्षमता असलेल्या पवार यांना 2014 च्या निवडणुकीतील मोदी लाट ओळखता आली नाही. संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाला त्यांनी केलेला टोकाचा विरोध त्यांची पुढची राजकीय गणिते चुकवणारा ठरला. तेव्हा ते भाजपसोबत राहिले असते तर 2015 च्या विधानसभा निवडणुकीत तेच भाजपचे उमेदवार राहिले असते. आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्रीही झाले असते याबद्दल कोणालाही शंका नव्हती. मात्र एकमेकाचे दिर्घकाळचे सहकारी राहिलेले पवार यांची मंत्रीपदाची आणि त्याआधी निधन झाल्याने मुंडे यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. त्यांच्या त्या निर्णयामुळे एक झाले ते आयुष्यभर विरोधक म्हणूनच राहिले. कदाचित नियतीलाच तेच मान्य असावे. 


आमदारकी असो अगर नसो सतत जनतेच्या गराड्यात असणारे ते अलिकडील काळातील एकमेव राजकारणी होते. अचूक राजकीय टायमिंग ही त्यांची ओळख होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संज पाटील यांची प्रतिमा त्यांनी जेवढी ब्रेक केली तेवढी कॉंग्रेसजणांनाही शक्‍य झाली नाही. मात्र तो विरोधच त्यांना कायम विरोधक ठरवून गेला. त्यानंतर पवार कायमचे राजकीयदृष्ट्या बॅकफुटवर गेले. दुसऱ्या बाजूला पूर्ण राजकीय कारकीर्दपणाला लावून सर्वोदय कारखान्याचे स्वप्न त्यांनी साकारले होते. या उभारणीत त्यांच्यासोबत असलेले व्यकांप्पा पत्की आणि जयंत पाटील यांच्याशी त्यांची मैत्री तुटली ती कायमचीच. सर्वोदय कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचा संघर्ष सुरु झाला. आयुष्यभर संघर्ष वसंतदादा घराण्याशी राहिला. दादा घराण्याशी त्यांनी केलेहा हा संघर्ष जिल्ह्याचा आता राजकीय इतिहास असेल. महापालिकेतील अनेक भानगडींवर पवारांचे मोर्चे आणि भाषणे यांनी एक काळ सांगली दणाणून गेली. विरोधकांनी त्यांचे कार्यकर्तेही फोडले. पण संभाजी पवार म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारी फॅक्‍टरीच होती. त्यांनी पुन्हा न खचता नवी टिम बांधली आणि आपला दबदबा अखेरपर्यंत कायम ठेवला. कोणताही राजकीय वारसा नसलेला माणूस आमदार होऊ शकतो हे त्यांनी सिध्द करून दाखवले आणि तो यशस्वीही होऊ शकतो हेही त्यांनी दाखवून दिले. एका बेधडक राजकारण्याला आपण मुकलो. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com