स्मृती दिन विशेष : राजर्षी शाहू महाराज सामाजिक समतेचा आग्रह

१९२० मध्ये म्हणजे शंभर वर्षांपूर्वी माणगावची परिषद राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.
शाहू महाराज
शाहू महाराज

नांदेड : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्याची सुरुवात ख-या अर्थाने कोल्हापूर (Kolhapur) संस्थानातील माणगाव परिषदेपासून झाली असे समजले जाते. अर्थात त्यामागे महात्मा फुले (Mahatma phule) यांनी उभारलेल्या सत्यशोधकी चळवळीची पार्श्वभूमी होतीच. Memorial Day Special: Rajarshi Shahu Maharaj insists on social equality

१९२० मध्ये म्हणजे शंभर वर्षांपूर्वी माणगावची परिषद राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. शाहू महाराज हे सामाजिक समतेचा केवळ आग्रह धरणारे नव्हते तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे राजे होते. ते राजेशाहीला लोकशाहीचे स्वरुप देऊ पाहात होते.

खरे तर राजेशाहीमध्ये शोषणाचीच परंपरा राहिलेली आहे. सम्राट अशोक, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे असे काही सन्माननीय अपवाद वगळले तर बहुतेक राजे हे विषमतेचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत.

हेही वाचा - हिंगोली: वैद्यकीय कारणासाठी तरी पैसे द्या; रुग्णांच्या नातेवाईकांना बँकाकडून नकार

१८७० साली कोल्हापूर संस्थानचे कारभारी माधवराव यांनी चित्पावनांची केलेली भरती, चौथ्या शिवाजी राजांचा केलेला छळ, चित्पावनांना विशेष संधी आणि स्थानिकांची सर्रास उपेक्षा यामुळे जनतेत असंतोष पसरलेला होता. सनातन्यांची दबलेल्या समाजावर विलक्षण पकड होती. समाज मांडणीच्या चुकीच्या कल्पनांनी त्यांना पछाडलेले होते. कोणी कोणाचे ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हते. त्यातच वेदोक्त प्रकरणामुळे सनातन्यांचे पितळ उघडे पडले होते. यातून टिळकही सुटले नाहीत. विषमतेचा पुरस्कार हा समाजाच्या दृष्टीने केव्हाही घातकच असतो.

१८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानात जवळपास सर्वच म्हणजे ७१ अधिकारी चित्पावन होते. ही बाब शाहू महाराजांसारख्या संवेदनशील राजाला खटकणारी होती. त्यामुळे शासनात बदल करणे त्यांना खूप गरजेचे वाटू लागले. त्याचाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे छत्रपती शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी मागासवर्गीयांना ५०% जागा देण्याचे परिपत्रक काढले. यामुळे महात्मा फुल्यांसारख्या समाज सुधारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आले. परंतु या घटनेमुळे सनातनी खूप चिडले‌. अधिकारांवर गदा येते म्हणून त्यांनी आकांडतांडव केले. शाहू महाराजांवर बदनामीचे शस्र चालवून पाहिले.

परंतु आपल्या निश्चयापासून ढळतील ते शाहू राजे कसले? त्यांनी अधिक जोमाने कामाला सुरुवात केली. चर्मकार समाजातील दत्तोबा पोवार यांना वकिलीची सनद दिली. गंगाधर कांबळे यांना हॉटेल उघडून दिले. सत्यशोधक भास्करराव जाधव यांची संस्थानात सहायक सर सुभा म्हणून नेमणूक केली. अर्थात ह्या बाबी सहजासहजी घडलेल्या नाहीत. सनातन्यांनी खूप कुरकूर केली.

येथे क्लिक करा - नांदेड : तेंदुपत्ता खरेदी बंद झाल्याने दुर्गम भागातील रोजगार वंचित

आपल्या अवतीभोवती असलेले सामाजिक पर्यावरण शाहू महाराजांना अस्वस्थ करीत होते. अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांमध्ये सहजासहजी बदल होणे शक्य नाही. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत होती. त्याच समाजातून आलेल्या माणसाने कान उघाडणी केली पाहिजे असे वाटत होते. त्याच वेळी डॉ. आंबेडकर नावाचा एक विलक्षण बुध्दीमत्तेचा तरुण ब्रिटनमध्ये शिक्षण घेऊन आलेला आहे, ही वार्ता त्यांच्या कानावर गेली. आणि पुढे माणगावच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूरात परिषद घेतली तर सनातन्यांचे पित्त खवळेल. ते काही कारस्थाने घडवून आणतील म्हणून महाराजांनी जाणीवपूर्वक ही सामाजिक परिषद माणगावला आयोजित केली. या परिषदेच्या नियोजनाची जबाबदारी अप्पासाहेब दादागोंडा पाटील यांच्या वर सोपविली.

या परिषदेने पाटलांचा खूप अडचणीत आणले. जात पंचायतीने सात वर्ष वाळीत टाकले. सनातन्यांनी कट्टर विरोध केला. परंतु माणगावची ही परिषद ऐतिहासिक ठरली. तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणा-या समाजाला बाबासाहेब नावाचा एक खंबीर नेता मिळाला. याचे सूतोवाच राजर्षी शाहू महाराजांनी याच परिषदेत केले होते. तेव्हा ते देशातील नामवंत पुढा-यापैकी एक होते.

आपल्या भाषणात ते म्हणाले,' लोकहो, आपले हित कशात आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकर हे आपल्यातील अत्यंत विद्वान गृहस्थ आहेत. तेच आता आपले पुढारी. एक वेळ अशी येईल की, हे सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते.'

छत्रपती शाहू महाराजांचे हे भाषण खूप वैशिष्ट्यपूर्ण होते. सर्व समाजाला एका पातळीवर आणण्याचा हा प्रयोग होता. विषम सामाजिक रचनेला सुरुंग लागल्याची ही नांदी होती. पुढे खूप मोठे सामाजिक मन्वंतर उभे असल्याचे हे भाकीत होते. परंतु माणगाव परिषदेनंतर पुढे दोन वर्षातच शाहू महाराजांचे निधन झाले आणि सामाजिक परिवर्तनाच्या जोमदार सुरवातीची गती खंडित झाली. शाहू महाराज आणखी काही काळ जगले असते तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

ज्येष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम यांच्या फेसबूक वॉलवरुन साभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com