मुंबई - कामकाज पाहण्यासाठी शरद पवार 1967 मध्ये विधिमंडळात आले होते; मात्र गॅलरीचा पास त्यांना मिळाला नाही. त्यानंतर विधानसभेचे सदस्य झाल्याशिवाय विधानभवनात जायचे नाही, अशी खूणगाठ बांधून पवारसाहेब जिद्दीने राज्याचा विधानसभेचे सदस्य झाल्याची आठवण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत करून दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यामुळे विधान परिषदेत मांडलेल्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर ते बोलत होते. तटकरे म्हणाले, ""शरद पवार कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस असताना मुंबईतील टिळक भवन म्हणजे कॉंग्रेसचे मुख्यालय होते. सरचिटणीस या नात्याने पवारसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्या वेळी त्यांनी एसटी बसने प्रवास केला आणि कार्यकर्त्यांच्या घरातील चटणी-भाकरी खाऊन पवारांनी कॉंग्रेसची बांधणी केली.''
शरद पवार यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण यांचामुळे फुलले. 1974 मध्ये राज्यातील सत्तेत सहभागी होताना पवार यांनी कृषी खाते मागून घेतले. कृषी खात्याचा मंत्री म्हणून त्यांनी शेतीला उद्योगाची जोड दिली, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज कृषी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती झाल्याची आठवण तटकरे यांनी करून दिली. "महाराष्ट्र सावरायचा असेल, तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही', असे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील म्हणाले होते, अशी आठवण तटकरे यांनी करून दिली. मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार करताना मुख्यमंत्री पद गेले तरी चालेल, अशी भूमिका मांडणाऱ्या शरद पवार यांचे प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, दादासाहेब गवई आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांना लोकसभेवर निवडून आणण्यात मोठे योगदान असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. परंतु या दोघांचा गौरव राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थित विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात घेण्याची मागणी तटकरे यांनी केली. शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नारायण राणे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी चर्चेच्या दरम्यान आठवणींना उजाळा दिला.
|