मुंबई - ज्याप्रमाणे एखादा रोग बरा व्हावा, यासाठी डॉक्टर औषधांच्या नावांची चिठ्ठी अर्थात प्रिस्क्रिप्शन लिहून देतात त्याच धर्तीवर कृषी विभागाचे निविष्ठा व पत नियंत्रण अधिकारी पिकांवरील रोगांसाठी फवारणी करण्यासाठी योग्य अशा औषधांची चिठ्ठी शेतकऱ्यांना लिहून देतील. यावर कृषी विभागात बैठकांचे सत्र झडत असून, लवकरच याबाबत ठोस अंमलबजावणी होणार आहे. कृषी विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जिवांचा धोका टळणार आहे.
राज्यात विषारी औषध फवारणीत 43 हून जास्त शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना प्राणास मुकावे लागले आहे. यामुळे पिकांवरील रोगराई आणि औषध फवारणी हे विषय चर्चेचे बनले आहेत. यावर केवळ फवारणी औषधनिर्मिती कंपन्या किंवा विक्रेत्यांवर कारवाई करून हा विषय संपणारा नाही, हे लक्षात आल्याने कृषी विभागाने यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी या विभागातील जाणकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ज्याप्रमाणे एखाद्या रोगावर निश्चित असे औषध, गोळ्या घेण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून देतात, त्याचप्रमाणे कृषी विभागाचे निविष्ठा व पतनियंत्रण अधिकारी शेतकऱ्यांना चिठ्ठी लिहून देतील. या चिठ्ठीवर संबंधित अधिकाऱ्याचे नाव, शिक्का असेल. शेतकऱ्यांची संख्या, भौगोलिक अंतर व वेळ याचा विचार करून कृषी सहायक, कृषी अधीक्षक, निविष्ठा व पतनियंत्रण अधिकारी ही चिठ्ठी लिहून देणार आहेत. ही चिठ्ठी कृषी औषध विक्रेत्याच्या दुकानात घेऊन गेल्यानंतर त्या चिठ्ठीनुसार शेतकऱ्याला औषधे मिळतील. याबाबत लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांचे प्रबोधन करून अशा प्रकारे योग्य पिकासाठी योग्य फवारणी औषधासाठी कृषी विभागाकडून अधिकृत "प्रिस्क्रिप्शन' दिले जाणार आहे. यामुळे शेतकरी बळी जाणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांच्या जिवाला काही धोका झाला, तर कोणाला जबाबदार धरायचे याबाबत संदिग्धता राहणार नाही.
गावपातळीवर अधिकाऱ्यांना सामावून घेणार
गावची ग्रामसभा वर्षातून चारवेळा भरते. या ग्रामसभेत महत्त्वाची पिके आणि त्यावरील फवारणीसंदर्भात महत्त्वाच्या कंपन्यांच्या औषधांची नावे जाहीर करणे. तसेच ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक या सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम आणखी व्यापक केले जाणार आहे. जेणेकरून विषारी औषधाने शेतकऱ्यांचे बळी जाता कामा नयेत.
|