रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाले 15 दिवसांत हटवा! - राज ठाकरे

रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाले 15 दिवसांत हटवा! - राज ठाकरे

मुंबई - रेल्वे स्थानके आणि त्यांच्या परिसरातील फेरीवाल्यांना रेल्वेने 15 दिवसांत हटवावे; अन्यथा सोळाव्या दिवशी मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना तेथून हाकलून लावतील, असा इशारा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे दिला.

एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीचा जाब रेल्वे प्रशासनाला विचारण्यासाठी मनसेने पश्‍चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील मुख्यालयावर आज मोर्चा काढला. मेट्रो सिनेमागृहापासून सुरू झालेल्या मोर्चाचे रूपांतर चर्चगेट येथे सभेत झाले. रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर राज यांनी भाषण केले. आम्ही आज शांततेत मोर्चा काढला; पण परिस्थिती न सुधारल्यास यापुढे शांततेत मोर्चा निघणार नाही. जे काही होईल त्याची जबाबदारी रेल्वेवर असेल, असेही राज यांनी बजावले.

राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की व्यक्ती म्हणून मोदी यांच्याशी देणेघेणे नाही; पण ते आधी एक बोलत होते, आता एक बोलत आहेत. मला काही जण सांगतात, की मोदींचा आवाज ऐकला की लोक टीव्ही बंद करतात. शेतकऱ्यांच्या जिवावर हे सरकार सत्तेत आले; पण ते आता कर्जमाफी करू शकणार नाही. विकास वेडा झालाय ही कॉमेंट भाजपमधूनच व्हायरल करण्यात आली.

गव्हर्नरांनी आर्थिक मंदी वाढणार असल्याचे म्हटले आहे, याचा अर्थ नोकऱ्या जाणार. दोन- चार लोक देश चालवत आहेत. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही बुलेट ट्रेनला विरोध केला. म्हणून त्यांचे रेल्वेमंत्रिपद काढून घेण्यात आले, असा आरोपही राज यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com