नागपूर - देशात व्याघ्रगणनेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, महाराष्ट्रातील जंगलात सुमारे 235 ते अडीचशे वाघ असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ही आनंदाची बाब असली तरी दिवसेंदिवस जगंलाची गुणवत्ता कमी होत चालल्याने भविष्यात वाघांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. याच कारणामुळे मानव व वन्यजिवांमधील संघर्ष वाढणार असल्याचा निष्कर्षसुद्धा तज्ज्ञांनी काढला आहे.
डिसेंबर 2017 पासून राज्यात व्याघ्रगणनेला सुरवात झालेली आहे. त्याची आकडेवारी देशपातळीवर मार्च 2019 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राज्यात सर्वच व्याघ्र प्रकल्पांसह इतरही गणना झालेल्या भूभागातील वाघ आणि वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे, खुणा आणि विष्ठांचे नमुने, कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र आणि इतरही माहिती तातडीने पाठविण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयांनी संबंधितांना पाठविलेल्या आहेत. यंदा जळगावमध्येही वाघांचे अस्तित्व दिसल्याची माहिती पुढे आलेली आहे.
गणनेमध्ये देशातील वाघांची संख्या 2 हजार 500 पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात वाघांची संख्या वाढलेली दिसली, तरी यामध्ये वाघ आढळणारी सर्वच राज्ये चांगले काम करत आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थिती चांगली आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढली आहे.
वर्ष - देशातील - राज्यातील संख्या
2010 - 1700 - 169
2014- 2226 - 190
2018- 2500 - 250 अंदाजे
|