मुंबई - मढ जेट्टी परिसरात बुडालेल्या रोहित शहा (वय 17) याचा मृतदेह गुरुवारी सापडला; तर वरळी येथे 28 वर्षांच्या एका युवकाचा मृतदेह सापडला. त्यामुळे पाऊसबळींची संख्या नऊ झाली आहे. नाल्यात वाहून गेलेले तीन जण अजूनही बेपत्ता आहेत.
अंधेरी-पश्चिम येथील सागर कुटीर सोसायटीत राहणारा रोहित नातेवाइकांसह गणपती विसर्जनासाठी मढ जेट्टी येथे गेला होता.
पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. गुरुवारी त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहिसरच्या कोकणीपाडा येथील नाल्यावरील लाकडी पूल वाहून गेला. त्या वेळी पुलावर असलेले गौरेश उघडे व प्रतीक घाटाळ (20) वाहून गेले. त्यापैकी गौरेशला स्थानिकांनी वाचवले; पण प्रतीक बेपत्ता आहे. कांदिवलीच्या महिंद्रा यलोगेट नाल्यात पडलेली सायकल काढण्यासाठी उतरलेला ओमप्रकाश निर्मल (26) वाहून गेला. एमआयडीसी परिसरातील मरोळ पाइपलाइन नाल्यात जावेद शेख (25) हा वाहून गेला. नाल्याच्या पुरात कुत्रा अडकल्याने त्याला वाचवण्यासाठी तो गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो व कुत्रा दोघेही वाहून गेले.
तिघे बेपत्ता झाल्याची तक्रार
आता पाऊस थांबला अन् पाणीही ओसरले; परंतु मुंबईतील आणखी तीन नागरिक अजूनही घरी परतलेले नाहीत. अनुक्रमे 56 व 28 वर्षांचे दोन जण बेपत्ता असल्याची तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात; तर 15 वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याशिवाय, वांद्रे येथील दोन व्यक्तींनी आपले नातेवाइक बेपत्ता झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या आहेत. मात्र, त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.
|