'काही दिवसांनी मोदी जनतेची नसबंदी करतील !'

Dhananjay Munde
Dhananjay Munde

सातारा : 'नरेंद्र मोदींनी सुरवातीला नोटाबंदी केली, त्यानंतर मांसबंदी, आता लालदिवाबंदी केली. काही दिवसांनी ते जनतेची नसबंदी करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत,' अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. 

असवली (ता. खंडाळा) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात मुंडे बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, बाळासाहेब सोळस्कर, मनोज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अच्छे दिन येण्याऐवजी उलट बुरे दिन आले आहेत, अशी टिका करून श्री. मुंडे म्हणाले, मी एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेलो होतो. त्याला आले घातलेला चहा मागितला. तसेच चहामध्ये खरोखरच आले टाकता का असे मी विचारले. त्यावर चहावाला म्हणाला, मी थोडाच मोदी चायवाला आहे. मी आले टाकतो, मोदी चायवाला फसवितो आम्ही फसवत नाही, असे त्यांनी सांगितले. सत्तेवर आल्यावर प्रत्येकांच्या खात्यावर तीन महिन्यात 15 लाख टाकून लोकांना कर्जमुक्त करणार असे मोदींनी सांगितले होते. पण आठ नोव्हेंबरला परिस्थिती उलट निघाली. मोदींनी नोटाबंदी केली, मांसबंदी केली, आता लालदिवाबंदी केली, काही दिवसांनी ते म्हणतील, अब मैं अकेला मंत्री, कोई नही रहेगा मंत्री. या पुढे जाऊन आता ते जनतेची नसबंदी करण्यास ही मागेपुढे पाहणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. 

फडणवीस यांच्यावर टीका करताना मुंडे म्हणाले, 2014 च्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आठ अधिवेशने झाली तरी कर्जमाफीचा निर्णय घेता आलेला नाही. आता 30 ऑक्‍टोबरपर्यंत निर्णय घेतो, असे म्हणत आहेत. योगीने उत्तरप्रदेशात सत्ता येताच 15 दिवसांत कर्जमाफी दिली. पण महाराष्ट्रात 30 हजार कोटी रूपयांच्या कर्जमाफीला फडणवीस तयार नाहीत. मुंबई ते नागपूर या रस्त्याला 46 हजार कोटी खर्च करण्याची तयारी राज्य सरकार करते पण कर्जमाफीला ते तयार नाहीत. मुख्यमंत्री म्हणतात मी पाच पिढ्या शेतकरी आहे. ते कोणत्या अँगलने शेतकरी आहेत हेच समजत नाही. 

उध्दव ठाकरेंवर टिका करताना मुंडे म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दवसाहेबांना लाज वाटली पाहिजे, ते धड सरकारमध्ये राहात नाहीत, राजीनामाही देत नाहीत. आता ते परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या आमदारांना व मंत्र्यांना पावसाळ्यात खिशातील राजीनामा काढून ठेवा, असे सांगितले आहे. शिवसेनेने वाघाचे चित्र काढून तेथे सशाचे चित्र लावले पाहिजे.

काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com