#बेरोजगारी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा अभाव - भरत फाटक 

#बेरोजगारी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा अभाव - भरत फाटक 

कोणतेही क्षेत्र असो कामासाठी चांगले उमेदवार मिळत नाहीत. परिणामी, अनेक इच्छुक नोकरीविना राहतात, हे वास्तव आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये कौशल्याची आवश्‍यकता आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ते कौशल्य नसल्यामुळे ही स्थिती उद्‌भवते. 

वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये सीए किंवा सीएफए झालेल्या किंवा करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील अनुभव अतिशय आश्‍वासक असतात. काळाप्रमाणे अभ्यासक्रमात डोळसपणे करण्यात येणारे बदल आणि अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा दिल्या जाणाऱ्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना निश्‍चित फायदा होतो. इतर क्षेत्रांमध्येही याचा समावेश करणे हितावह ठरेल. 
(श्री. फाटक हे सनदी लेखापाल आणि गुंतवणूक सल्लागार आहेत.)  
----------------------------------------------------------------------------------------

शिक्षणपद्धतीवरच विचार व्हावा - डॉ. दिलीप सातभाई  
देशाच्या दरडोई उत्पन्नावर (जीडीपी) देखील रोजगाराच्या संधी अवलंबून असतात. देशाचा जीडीपी वाढल्यास रोजगार क्षमतेतही वाढ होईल; परंतु सध्याची शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम रोजगार किंवा व्यावसायिक निर्माण करणारा आहे का? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
विविध क्षेत्रांतील आणि त्यातील ‘सेक्‍टर’प्रमाणे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळाल्यास कुशल मनुष्यबळ विकसित होणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करायला हवेत.
पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवीला कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभवाशी निगडित अभ्यासक्रम अपेक्षित आहे.
(डॉ. सातभाई हे सनदी लेखापाल आणि गुंतवणूक सल्लागार आहेत.)
----------------------------------------------------------------------------------------

काळानुसार अभ्यासक्रम बदलावा - डॉ. संजय मालपाणी  
काळ ज्या वेगाने बदलत आहे, त्या वेगाने अभ्यासक्रम बदलत नाही. अनेक वर्षांपूर्वी तयार केलेले अभ्यासक्रम पारंपरिक पद्धतीने शिकवत राहिले, तर महाविद्यालये यापुढील काळातही बेरोजगार तयार करीत राहतील.
अभ्यासक्रम निश्‍चित करताना विविध उद्योग क्षेत्रांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत. पदवी घेऊन बाहेर पडले, तर शिकलेल्या ज्ञानावर त्याला रोजगार मिळू शकला पाहिजे. शिक्षकांनीही अधिक व्यावसायिक व्हावे लागेल. त्यासाठी त्यांनी मानसिकता बदलली पाहिजे.
तंत्रज्ञानाच्या वापराचा समावेश अभ्यासक्रमात असावा. उद्योग क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी किमान तीन महिने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविणे, हे अभ्यासक्रमात असावे.
(डॉ. मालपाणी हे उद्योजक आहेत.)

----------------------------------------------------------------------------------------
गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य हवे - अभय जेरे 
चांगली गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेली असंख्य महाविद्यालये देशभरात आहेत. केवळ अभियंता म्हणून पदवी मिळविण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता असते. म्हणून गुणवत्ता नसलेली मुलेही या अभ्यासक्रमाकडे जातात.
रोजगारक्षम अभियंत्यांचा अभाव हे देशभरातील चित्र आहे. शिक्षणातून गुणवत्ता आणि कौशल्य हरविल्याचा परिणाम म्हणजे बेरोजगार निर्मिती आहे.
विविध क्षेत्रांची गरज लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने अभ्यासक्रमात बदल करावेत.
(श्री. जेरे हे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचे संयोजक आहेत.)

रोजगार मेळाव्यासंबंधी सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com