वाहतूक फेरबदलामुळे कोंडीत भर

हिंजवडी, शिवाजी चौक - आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक एकेरी पद्धतीने केल्याने सोमवारी दिवसभर शिवाजी चौकापासून वाकडपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगा.
हिंजवडी, शिवाजी चौक - आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक एकेरी पद्धतीने केल्याने सोमवारी दिवसभर शिवाजी चौकापासून वाकडपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगा.

हिंजवडी - नव्या पोलिस अधिकाऱ्याने मनमानी पद्धतीने केलेल्या प्रायोगिक फेरबदलामुळे आयटीयन्ससह स्थानिक वाहनचालकांना सोमवारी (ता. १६) दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

राज्यकर्ते व प्रशासनाला हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना, अशी अवस्था झाली असतानाच हिंजवडीच्या मुख्य शिवाजी चौकात बॅरिकेड्‌स लावून एकेरी वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे आधीच अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या शिवाजी चौकापासून वाकडपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. आयटी उद्यानाच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात जाणारी वाहतूकदेखील हिंजवडी पोलिस ठाण्याजवळील सर्कलपासून (फेज वन)मधून वळविण्यात आल्याने आयटीयन्स प्रवाशांसह स्थानिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. स्थानिक हिंजवडीकरांसह मारूंजी, नेरे, जांबे परिसरात जाणाऱ्या वाहनचालकांना तर संपूर्ण आयटी पार्कला वळसा घालून यावे लागल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची भावना होती.  

हिंजवडीच्या वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून किशोर म्हसवडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर हा बदल केला. मात्र, वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी अधिकच वाढली. आयटी पार्कमध्ये जाणारी वाहतूक व स्थानिक नागरिकांची वाहने एकाच रस्त्यावर आल्याने मोठी समस्या निर्माण झाली. एरवी सकाळ संध्याकाळच्या वेळेतच हिंजवडीत वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मात्र, सोमवारी फेरबदलामुळे दिवसभर वाहतूक कोंडी होती. त्यामुळे प्रवासी हैराण झाले होते.

बीआरटी बदलही अपयशी 
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा म्हणून तत्कालीन पोलिस निरीक्षक दत्तात्रेय पाटील यांनी हिंजवडी वाकड रस्त्यावर एका लेनमध्ये बॅरिकेड्‌स लावून बसगाड्यांसाठी स्वतंत्र लेन तयार केली होती. या लेनमधून बीरआरटीप्रमाणेच खासगी व सरकारी बसगाड्याच धावतील, असा त्यांचा मानस होता. मात्र, हा बदलही सपशेल अपयशी ठरल्याचे मुळशी तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश पारखी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक मार्गात फेरबदल केले पाहिजेत. रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत.’’

हा बदल प्रायोगिक तत्त्वावर केला होता. पावसामुळे चारचाकींची संख्या वाढल्याने पुण्याकडून हिंजवडीला येणारी वाहने मुख्य चौकात थांबू नयेत, हा यामागील उद्देश होता. 
- किशोर म्हसवडे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com