'आयटी' उद्योगाला चार 'एफएसआय' 

Representational Image
Representational Image

पुणे : माहिती तंत्रज्ञान उद्योगाला (आयटी) वाढीच्या दिशेने नेण्याकरिता राज्य सरकारने आणखी एक पाऊल उचलले असून, या उद्योगातील कंपन्यांना जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः जागतिक पातळीवरील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी या उद्योगाला आता तीनऐवजी चार 'एफएसआय' देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हा निर्णय घेतल्यास आयटी उद्योग वाढून रोजगारनिर्मिती होण्याची आशा राज्य सरकारला आहे. 

या उद्योगातील सार्वजनिक (पब्लिक) आणि खासगी आयटी पार्कला चार 'एफएसआय' मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच, 'आयटी'शी संबंधित छोट्या-मोठ्या उद्योगांनाही विस्तार करता येणार आहे. त्याकरिता माहिती तंत्रज्ञान धोरणात (आयटी पॉलिसी) बदल करण्यात येणार आहे, असे राज्याच्या उद्योग खात्याकडून सांगण्यात आले. हा उद्योग रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने त्याला जादा 'एफएसआय' मिळाल्यास तो आणखी विस्तारेल. याबाबतचा निर्णय होऊन अधिसूचना जाहीर होताच अंमलबजावणी केली जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

पुणे शहरातील आयटी उद्योग वाढविण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात नवे आयटी पार्क उभारण्यासाठी जागांचा शोध घेण्यात येत आहे. त्याकरिता प्राथमिक पाहणीही केली आहे. पुण्यात सध्या हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, खराडीतील इऑन आयटी पार्क, तळवडेतील आयटी पार्कचा समावेश आहे. शिवाय, पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये जवळपास 185 खासगी आयटी पार्क उभारण्याला परवानगी देण्यात आली असून, त्यापैकी 70 आयटी पार्कचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील बहुतांश कंपन्यांना जुन्या धोरणानुसार दोन आणि तीन 'एफएसआय' देण्यात आला आहे.

साधारणतः दोन वर्षांपूर्वी दोनऐवजी तीन एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात आता पुन्हा आणखी एक एफएसआय वाढविण्याच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, असे सांगण्यात आले. याबाबत सरकारने महापालिकांकडून अभिप्राय मागविला आहे. 

या उद्योगातील नामांकित कंपन्या पुण्यात येण्यास उत्सुक आहेत; मात्र पुरेशी जागा मिळत नसल्याने या कंपन्यांपुढे अडचणी येत असल्याची बाब 'मेक इन महाराष्ट्र'तून राज्य सरकारच्या निदर्शनास आली होती. हिंजवडीतील आयटी पार्कचा विस्तार करून चौथ्या टप्प्याचे (फेज 4) काम हाती घेण्याचे उद्योग खात्याचे नियोजन आहे. मात्र, त्याकरिता जागा मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध जागांमध्ये उद्योगांना आपला विस्तार करता यावा, यासाठी 'आयटी'ला जादा 'एफएसआय' देण्याची या उद्योगांची मागणी आहे. 

हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल पटवर्धन म्हणाले, ''आयटी उद्योगवाढीचा वेग तसा कमी झाला आहे. तो पुन्हा चांगल्या वेगाने वाढेल. परंतु त्यासाठी कंपन्यांना सुविधा हव्यात. मुख्यतः पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली पाहिजे. पण, सध्या ती मिळत नसल्याने जादा 'एफएसआय' दिल्यास कंपन्यांना विस्तार करता येईल. त्यातून रोजगारनिर्मितीही होईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com